सांगली ः ताकारी सिंचन योजनेच्या पाणीपट्टीत यंदापासून वाढ करण्यात आली आहे. उसासाठी एकरी तब्बल २०३२ रुपये इतकी वाढ झाली आहे. फळबागेसाठी पाणीपट्टी ९८२ रुपयांनी वाढली आहे. या पाणीपट्टीवाढीचे कारण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले नाही.
त्यामुळे या सिंचन योजनेच्या नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव पाणीपट्टीचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. पाटबंधारे विभागाने पाणीपट्टीची केलेली वाढ चुकीची आहे, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.
ताकारी सिंचन योजना ही जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आणि कडेगाव, खानापूर, तासगाव तालुक्यांत विस्तारलेली आहे. या तालुक्यांतील एकूण क्षेत्र १३ हजार ६१८ हेक्टर आहे. त्यापैकी केवळ ९ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे.
यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ झाला आहे. अनेक शेतकरी या योजनेची पाणीपट्टी वेळेत भरतात. त्याचप्रमाणे कारखान्याच्या माध्यमातूनही पाणीपट्टी भरली जाते; मात्र ताकारी उपसा सिंचन योजनेचे वेळत पाणी मिळत नाही. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते.
मुळातच ताकारी सिंचन योजनेची पाणीपट्टी अधिक आहे. त्यामुळे त्याची जुळवाजुळव करताना कठीण जाते. त्यातच पाटबंधारे विभागाकडून पाणीपट्टी वाढविण्याची घोषणा केली आहे. वाढीव पाणीपट्टीनुसार पाणीपट्टीवसुलीचे काम पाटबंधारे विभागाने हाती घेतले आहे. अगोदर या योजनेचे पाण्याचे आवर्तन सुरळीत करा, अशी मागणी होऊ लागली आहे.
पाणी जरी वेळेत मिळाले तरी वाढीव पाणीपट्टी देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. पाटबंधारे विभागाने केलेली पाणीपट्टीवाढ शेतकऱ्यांना मान्य नसल्याचे चित्र आहे.