पुणे : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील दुर्गम डोंगराळ भागातील लोकांना कायमस्वरूपी पाण्याची सोय व्हावी, यासाठी शिवकालीन टाक्यांप्रमाणे खडकातील टाक्या बांधण्याची नवीन्यपूर्ण योजना जिल्हा परिषदेने हाती घेतली आहे. या टाक्यांसाठी अंदाजपत्रकात एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
‘सह्याद्री’च्या पूर्वउतारावर असलेल्या दुर्गम, डोंगराळ भागात पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो. या भागात उतार अधिक असल्याने हे पाणी साठून न राहता वेगाने वाहून जाते. त्यामुळे पाण्याअभावी तेथे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर टंचाईला तोंड द्यावे लागते. उंचावर असलेल्या या भागात टॅंकरने पाणीपुरवठा करणे, पाणीपुरवठ्यासाठी उपसा योजना करणे शक्य होत नाही. परिणामी, रहिवाश्ाांना पिण्याच्या पाण्यासाठी दूर अंतरापर्यंत पायपीट करावी लागते.
यापर्वी काही भागांत अशा टाक्या खोदल्याने पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे. जिल्हास्तरीय जलयुक्त शिवार अभियान समितीनेही नुकतीच भाेर आणि वेल्हा तालुक्यातील काही गावांत खडकांच्या टाक्यांसाठी एक कोटी ७५ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
अाता जुन्नर, अांबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्याच्या पश्चिमेकडील डोंगरावर असलेल्या अनेक वाड्यावस्त्यांना पाण्याची सातत्याने भासणारी टंचाई कायमची दूर करण्यासाठी खडकातील पाण्याच्या प्रवाहांचा शोध घेऊन तेथे टाक्या खोदण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेने एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे.