‘टेंभू’च्या पाणीपट्टी, वीजबिलापोटी साडेचौदा कोटी रुपये जमा

टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाच्या पाणीपट्टी वसुलीसाठी चांगला प्रतिसाद आहे. मात्र, कारखान्यांनी वेळेत पाणीपट्टी भरण्यास सहकार्य करावे. यामुळे वेळेत आवर्तन देण्यास सोपे जाईल. - राजन रेड्डीयार, कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प, टेंभू, जि. सातारा.
पाणी योजना
पाणी योजना
सांगली  ः सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाच्या २०१७-१८ या आर्थिक वर्षात पाणीपट्टीपोटी ६ कोटी ८३ लाख, तर वीजबिलापोटी ७ कोटी ७५ लाख असे एकूण १४ कोटी ५८ लाख रुपये जमा झाले आहेत, अजून किमान या आर्थिक वर्षातील वीजबिल आणि पाणीपट्टीपोटी ५ कोटी रुपये जमा होणे बाकी आहे. उर्वरित थकबाकी वसूल करण्याचे काम सुरू आहे. साखर कारखान्यांनी पाणीपट्टी भरण्यासाठी पुढे आले पाहिजे, तरच आवर्तन वेळेत सुरू ठेवणे शक्‍य आहे, अशी माहिती टेंभू प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली.
 
टेंभू उपसा सिंचन प्रकल्पात सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, सांगली व सोलापूर जिल्ह्यात ८०,४५६ हेक्‍टरचा समावेश आहे. साधारणपणे सांगली जिल्ह्यातील कडेगाव, आटपाडी, खानापूर, विटा, तासगाव, जत व कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्‍यांतील १८२ गावांचा व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्‍यातील ३२ गावांचा त्यामध्ये समावेश आहे. यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतीला पाणी मिळाले आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत सुमारे ११ साखर कारखाने आहेत. पाणीपट्टी वसुलीसाठी कारखानादार पुढाकार घेतात, ही बाब चांगली आहे. यामुळे पाणीपट्टी वसुलीसाठी फायदा होतो. यामुळे आवर्तन सोडण्यास सोपे होते. मात्र, काही दिवसांपासून कारखानादार पाणीपट्टी भरण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे.
 
त्यामुळे साखर आयुक्त कार्यालयात लाभ क्षेत्रातील सर्व कारखान्यांची बैठक घेतली होती. त्यामध्ये साखर कारखान्यांना प्राधान्याने ऊसबिलातून पाणीपट्टीची कपात करून ती टेंभू प्रकल्पाला द्यावी, असा निर्णय झाला. जे कारखाने पाणीपट्टी भरत नाहीत, अशा साखर कारखान्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा आदेश काढला. त्यामुळे बहुतांश साखर कारखान्यांनी ऊसबिलातून पाणीपट्टीची कपात करून पाणीपट्टी भरली देखील. मात्र, अनेक साखर कारखाने या आदेशाकडे दुर्लक्ष करत आहेत.
 
या प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पाणीपट्टी भरण्यासाठी साखर कारखान्याचा पुढाकार असतो. मात्र, उस गाळपाला गेल्यानंतर लगेच ऊसबिलातून पाणीपट्टीची कपात करून ती पाटबंधारेत भरणे अपेक्षित असते. मात्र, ती भरण्यास विलंब होतो, त्यामुळे भविष्यात आवर्तन सोडण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. यामुळे कारखान्यांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com