रब्बीसाठी ‘जायकवाडी’तून आवर्तनाची शक्यता धूसर

रब्बीसाठी ‘जायकवाडी’तून आवर्तनाची शक्यता धूसर
रब्बीसाठी ‘जायकवाडी’तून आवर्तनाची शक्यता धूसर

परभणी ः  पैठण येथील जायकवाडी धरणामध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा अद्याप निम्माही उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी कालव्याद्वारे पाणी आवर्तने मिळण्याची शक्यता धूसर आहे. सध्या संरक्षित पाणी आवर्तन सुरू आहे. परंतु पाण्याचा प्रवाह कमी असल्याने परभणी जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे डाव्या कालव्याच्या प्रवाहाचा वेग वाढविणे आवश्यक आहे.

यंदा कमी पावसामुळे तसेच वरच्या बाजूच्या धरणातून पाणी सोडण्यात न आल्यामुळे जायकवाडी धरणात ४७.६५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता. पावसाचा खंड पडल्यामुळे सप्टेंबर अखेरीस जायकवाडीच्या डाव्या कालव्याद्वारे २ हजार क्युसेकने तर उजव्या कालव्याद्वारे ९०० क्युसेकने संरक्षित पाणी आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे रविवारी (ता. ७) या धरणांमध्ये ४०.३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला होता.

या धरणावर अवलंबून असलेल्या शहरांच्या पाणीपुरवठा योजना, उद्योगधंदे, परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्र यांच्यासाठी पाणीसाठा राखीव ठेवला जाणार आहे. त्यामुळे सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध राहणार नाही. वरच्या भागातील धरणातून जायकवाडीच्या हिश्श्याचे पाणी सोडले तर उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ होऊन रब्बीत एखाद-दुसरे पाणी आवर्तन मिळू शकेल. परंतु, यंदा आधीच कमी झालेल्या पावसामुळे यंदा जायकवाडी धरण गतवर्षीप्रमाणे पूर्ण भरले नाही. सध्या संरक्षित पाणी आवर्तन सुरू असल्याने धरणातील उपयुक्त पाणीसाठा कमी होत चालला आहे. त्यामुळे डाव्या तसेच उजव्या कालव्याद्वारे रब्बी हंगामातील सिंचनासाठी पाणी आवर्तने मिळण्याची शक्यता दिसत नाही.

आवर्तनाचा प्रवाह वाढण्याची गरज जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याचे सर्वाधिक ९७ हजार ४०० हेक्टर लाभक्षेत्र एकट्या परभणी जिल्ह्यामध्ये आहे. सध्या कापूस, ऊस, तूर आदी पिकांसाठी तसेच रब्बी पिकांच्या पेरणीसाठी संरक्षित पाणी आवर्तन २ हजार क्युसेक्स प्रवाहाने सोडण्यात आले आहे. कालव्याच्या दुरवस्थेमुळे पाण्याची नासाडी तसेच कालव्याच्या प्रवाहाचा वेग देखील कमी आहे. केवळ मुख्य कालवे तसेच शाखा कालव्याद्वारे पाणी वाहत आहे. परंतु वितरिका आणि चाऱ्यांद्वारे शेतामध्ये पाणी पोचण्यास वेळ लागत आहे. अनेक भागातील शेतकऱ्यांना या पाणी आवर्तनाचा सिंचनासाठी उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. प्रवाहाचा वेग वाढण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सरंक्षित पाणी आवर्तनाचा लाभक्षेत्रातील जास्तीजास्त शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी कालव्याच्या प्रवाहाचा वेग वाढण्याची गरज आहे, असे संबंधित सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com