ऊसदराच्या प्रश्‍नावर अजूनही तोडगा नाहीच

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील उसाची पहिली उचल निश्‍चित करण्यासाठी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी (ता. १२) बोलविलेली बैठक कोणत्याही निर्णयाविना निष्फळ ठरली.

यंदाच्या हंगामात एफआरपी व त्यावर १०० रुपये अधिक देण्याची भूमिका जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी घेतली. पण शेतकरी संघटनांनी जकराया साखर कारखान्याने जाहीर केल्यानुसार २५०० रुपये आणि अधिकचे १०० रुपये अधिक देण्याची मागणी केली होती. पण यावर कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे बैठकीतच सरकार आणि कारखानदारांच्या नावाने शेतकरी संघटनांनी आक्रमक होत, आता आंदोलन आणखी तीव्र करण्याची घोषणा केली आहे.

पुण्यातील या बैठकीस सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आमदार बबनराव शिंदे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्यासह कारखानदार उपस्थित होते. त्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे, रयत क्रांती संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपक भोसले, ‘बळिराजा''चे जिल्हाध्यक्ष माउली हळणवर, ‘स्वाभिमानी’चे तानाजी बागल, विजय रणदिवे आदी उपस्थित होते.

गेल्या पंधरा दिवसांपासून ऊसदरासाठी शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. सहकारमंत्री देशमुख यांनी जिल्ह्यातील संघटना, कारखानदार यांच्यात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला; पण त्यावर कोणताच तोडगा निघालेला नाही. शेतकरी संघटनांनी सुरवातीला तीन हजार रुपयांच्या उचलीची मागणी केली.

कारखानदारांनी एफआरपी रक्कम व त्यावर १०० रुपयांचा हप्ता तत्काळ व उर्वरित १०० रुपये दोन महिन्यांनी देण्याची भूमिका घेतली. संघटनेने २५०० रुपयांची पहिली उचल व तत्काळ १०० रुपये आणि दोन महिन्यांनंतर १०० रुपये मिळावेत, अशी मागणी केली.

मूळात जिल्ह्यातील अनेक कारखान्यांची एफआरपी ही २००० रुपयांच्या पुढे जात नाही आणि मागणी होणारी २७०० रुपयांची रक्कम या सगळ्या आकडेवारीचा मेळ बसत नसल्याने बैठकीत तोडगा निघू शकत नव्हता. दोन्ही बाजूंनी आपापल्या मागण्यांवर सगळे ठाम राहिल्याने चर्चा व्यर्थ ठरली. त्यामुळे या बैठकीनंतर स्वाभिमानी, रयत, बळिराजा, मनसेच्या कार्यकर्त्यांनी सहकारमंत्र्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत सरकार आणि कारखानदारांचा निषेध केला.

कारखानदारांच्या विरोधात आंदोलन ऊसदराच्या प्रश्‍नावर कोणताच तोडगा निघाला नसल्याने शेतकरी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या. कारखानदारांप्रमाणेच शेतकऱ्यांच्या हितासाठी संघटनाही एक होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व संघटनांनी एकत्रित येऊन कारखानदारांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले यांनी सांगितले.  तर येत्या १७ नोव्हेंबरला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या भंडारकवठे येथील लोकमंगल कारखान्यावर मोर्चा काढून ठिय्या देणार आहे, असे बळिराजा शेतकरी संघटनेचे संजय पाटील-घाटणेकर यांनी सांगितले.

कारखान्यांना एफआरपीप्रमाणे दर द्यावा लागेल. कोल्हापूरप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातही रक्कम देता येते का ते पाहावे, शेतकरी संघटना आणि कारखानदारांनी समन्वयाने चर्चा करून अंतिम निर्णय घ्यावा.

- सुभाष देशमुख, सहकार व पणनमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com