खान्‍देशातील तीन प्रकल्प भरले

खान्‍देशातील तीन प्रकल्प भरले
खान्‍देशातील तीन प्रकल्प भरले

जळगाव : मागील आठवड्यात झालेल्या पावसाने खान्‍देशातील तीन प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. त्यात धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळ्यानजीकचा अक्कलपाडा आणि जळगाव जिल्ह्यांच्या रावेर तालुक्‍यातील सुकी, मंगरूळ या मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे.

तापी नदीवरील हतनूर धरणातून विसर्ग सुरूच आहे. त्याचे २४ दरवाजे रविवारी (ता. १९) उघडे होते. तापी नदीला पूर आला आहे. नदीवरील धुळे जिल्ह्यातील सुलवाडे, नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तापी नदीचे उगमस्थान मध्य प्रदेशात असून, तेथे जोरदार पाऊस मागील महिन्यात आणि या महिन्यातही होत आहे. यामुळे तापीला पूर येत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमधील गिरणा धरणाचा साठाही ४० टक्‍क्‍यांपर्यंत, तर वाघूर धरणाचा साठा ३७ टक्क्यांवर पोचला आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्‍यास लाभदायी असलेल्या सातपुडा पर्वतातील अनेर धरणात मात्र ५० टक्‍क्‍यांपर्यंतही साठा झालेला नाही. चोपडा तालुक्‍यातील गूळ नदीवरील प्रकल्पही भरलेला नाही. जामनेर तालुक्‍यातील तोंडापूर धरणही मृतसाठा स्थितीत आहे. याबरोबरच पाचोरा तालुक्‍यातील बहुळा, चाळीसगावमधील मन्याड, पारोळा, एरंडोलनजीकचा भोकरबारी, अंजनी, अग्नावती प्रकल्प कोरडे आहेत. यावल तालुक्‍यातील मोर प्रकल्पातील साठा २५ टक्केही नाही.

पावसाची विश्रांती

खान्‍देशात मागील दोन दिवसांत कुठेही जोरदार पाऊस आलेला नाही. सोमवारी (ता. २०) सकाळी आठपर्यंत कुठेही अतिवृष्टी किंवा जोरदार पावसाची नोंद प्रशासनाकडे नव्हती. काही भागात पावसाची रिपरीप मात्र झाल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com