नगर ः ‘टोमॅटोचे भरघोस उत्पादन आले, सारं शेत लालभडक झालं. मात्र बाजारात रुपया-दोन रुपये किलोने ते विकावे लागतात. मिळणाऱ्या दरातून मजुरांची रोजंदारी भागत नाही. त्यामुळे हतबल झालेल्या अकोले तालुक्यातील एका शेतकऱ्याने शेतातले टोमॅटो शेतातच काढून टाकले. त्यामुळे साऱ्या शेतात टोमॅटोचा लालचिखलच दिसत होता.
जिल्ह्यातील अकोले तालुक्यात टोमॅटोचे पीक सर्वाधिक घेतले जाते. अकोल्याचे टोमॅटो मुंबई, नाशिकच्या बाजारात भाव खावून जातात. मात्र गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोला दर नाही. एका मजुराला दीडशे ते दोनशे रुपये मजुरी द्यावी लागते. शंभर किलोही टोमॅटो एक मजूर तोडू शकत नाही. मात्र, टोमॅटोला बाजारात ठोकमध्ये अवघा दोन ते तीन रुपयांचा दर आहे. त्यामुळे चार-सहा महिन्यांचे श्रम, खर्च सोडा, टोमॅटो विक्रीतून मजुरीही निघत नाही. त्यामुळे टोमॅटो उत्पादक हतबल आहेत.
संगमनेर- अकोले तालुक्याच्या सीमेवरील शिदोड शिवारात एका शेतकऱ्याने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून घेतलेले दर्जेदार टोमॅटो शेतातच काढून टाकले. लालभडक टोमॅटोचा शेतातच ‘लाल चिखल’ झाल्याने सारं शेत लालभडक दिसत होते. ‘कष्ट वाया गेलं, काय सांगणार’ असं बोलून संबंधित शेतकऱ्याने अधिक माहिती देण्याला नकार दिला.