पुणे : जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांनी गेल्या आठ दिवसांपासून टोमॅटो पीक लागवडीस सुरवात केली आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही टोमॅटोच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.
टोमॅटो पिकाची लागवड तीनही हंगामात करता येते. खरीप हंगामासाठी जून ते जुलै, रब्बी हंगामासाठी सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि उन्हाळी हंगामासाठी डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात लागवड होते. साधारणपणे २५ ते ३० दिवसांनंतर रोपे लागवडीस येतात. त्यानंतर रोपांची शेतात लागवड केली जाते. मात्र, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुणे, मुंबई या शहरातील बाजारपेठ जवळ असल्याने अनेक शेतकरी वर्षभर टोमॅटोचे पीक घेतात.
जिल्ह्यात प्रामुख्याने मार्च ते एप्रिल महिन्यात टोमॅटो लागवडीवर अधिक भर दिला जातो. त्यामुळे या टोमॅटोला चांगला दर मिळतो असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. सध्या बाजारात टोमॅटोचे दर अपेक्षित नाहीत. त्यामुळे काही प्रमाणात टोमॅटो उत्पादकांना तोटा सहन करावा लागत आहे. मात्र, आता लागवड केलेल्या टोमॅटोला जून ते जुलै महिन्यात चांगले दर मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
जिल्ह्यात उत्तरेकडील खेड, आंबेगाव, जुन्नर हे तीन तालुके टोमॅटोचे आगार म्हणून ओळखले जातात. याशिवाय शिरूर, बारामती, इंदापूर, दौड, पुरंदर भागातील अनेक शेतकरी टोमॅटोचे पीक घेतात. तसेच मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यात अल्प प्रमाणात शेतकरी टोमॅटो पीक घेऊ लागले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून खेड, आंबेगाव, जुन्नर भागातील अनेक शेतकरी प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर करून टोमॅटो पीक घेत असल्यामुळे उत्पादनात चांगली वाढ होत असल्याचे शेतकरी सांगू लागले आहे. अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे म्हणाले, की जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी टोमॅटोची लागवड करतात. मात्र, मार्च, एप्रिल महिन्यात लागवड केलेल्या टोमॅटोला चांगला दर मिळतो. त्यामुळे या भागातील अनेक शेतकरी या महिन्यात लागवडीला अधिक प्राधान्य देतात.