पिवळा वाटाणा आयातीकडे व्यापाऱ्यांचा कल

पिवळा वाटाणा
पिवळा वाटाणा

नवी दिल्ली ः देशात कडधान्यांचे भाव पडल्यानंतर सरकारने डाळी आयातीवर आयातशुल्क लावले आहे. त्यानंतर देशात पाच महिने पिवळ्या वाटाण्याची आयात झाली नाही. मात्र देशात आयात दारांनी आता पुन्हा पिवळा वाटाणा आयातीला सुरवात केली आहे. युक्रेनमधून २५ हजार टन खरेदी केली आहे, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. देशात कडधान्यांचे दर हमीभावाच्याही खाली गेल्याने भारत सरकारने ८ नोव्हेंबरला पिवळा वाटाणा आयातीवर ५० टक्के आयातशुल्क लावले होते. त्यानंतर पिवळ्या वाटाण्याची होणारी ही पहिली आयात आहे. व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘भारतातील आयातदारांनी युक्रेनमध्ये जवळपास २५ हजार टन पिवळ्या वाटाण्याची खरेदी कली आहे. ही खेरदी २७५ डॉलर प्रतिटन याप्रमाणे केली असून यासंबंधीचा कॉंट्रॅक्ट नुकताच झाला आहे. भारत सरकारने आधीच आयातीवर शुल्क लावले असल्याने आयातदारांना कॉंन्ट्रॅक्ट किंमतीवर ५० टक्के आयातशुल्क द्यावे लागणार आहे. मागील वर्षी याच काळात युक्रेनमधून पिवळा वाटाणा प्रतिटन ३५० डॉलर किमतीने आयात झाला होता. त्या वेळी भारत सरकारने आयातीवर कोणत्याही प्रकारचे आयातशुल्क लावलेले नव्हते.’’ आंतरराष्ट्रीय बाजारात पिवळ्या वाटाण्याचे दर कमी झाल्याने आयातीवर ५० टक्के शुल्क असतानाही आयात पुन्हा सुरू झाली आहे. भारतात दरवर्षी पिवळ्या वाटाण्याचे उत्पादन कमी प्रमाणात होते. त्यामुळे देशातील गरज भागविण्यासाठी व्यापारी मोठ्या प्रमाणात आयात करतात. २०१७-१८ मध्ये देशातील शेतकऱ्यांनी पिवळ्या वाटाण्याची १.२ दशलक्ष हेक्टरवर लागवड केली होती. २०१६-१७ मध्ये झालेल्या लागवडीपेक्षा ही लागवड कमी आहे. तसेच कमी पाऊस झाल्याने उत्पादन कमी झाले होते. देशात २०१६-१७ मध्ये पिवळ्या वाटाण्याची विक्रमी ३.१ दशलक्ष टन आयात झाली होती. तर यंदा सरकारने आयातशुल्क लागू केल्याने विदेशातून आयात २ दशलक्ष टनांवर राहण्याची शक्यता आहे. पिवळा वाटाणाडाळ सध्या कमी किमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे भारतातूनही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पिवळा वाटाणा डाळ हरभरा डाळीला पर्याय म्हणूनही वापरली जाते.   हरभरा आयातीला ‘ब्रेक’ फेब्रुवारी महिन्यात आॅस्ट्रेलियातून होणारी हरभरा आयात पूर्णपणे थांबली आहे. त्याआधीच्या दोन महिन्यांमध्ये, जानेवारीत ६७५ टन आणि डिसेंबर महिन्यात २० हजार ९९ टन हरभरा आयात झाली होती. भारत हा आॅस्ट्रेलियातून हरभरा आयात करणारा सर्वांत मोठा देश आहे. भारत सरकारने हरभरा आयातीवर विक्रमी ६० टक्के आयात शुल्क लावून देशातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले होते. भारताने आयात शुल्क लागू केल्याने आॅस्ट्रेलियातून हरभरा निर्यात कमी झाली आहे. जानेवारी महिन्यात आॅस्ट्रेलियातून ५८ हजार १९० टन निर्यात झाली होती. त्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात केवळ ५० हजार ८३२ टन निर्यात झाली आहे. भारताची आयात कमी झाली असली तरी बांगलादेशने आयात वाढविली असल्याने आॅस्ट्रेलियाला दिलासा मिळाला आहे. भारताने आॅस्ट्रेलियातून २०१५-१६ मध्ये १.०३ दशलक्ष टन हरभरा आयात केली होती तर २०१६-१७ मध्ये १.०८ दशलक्ष टन आयात केली होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com