तूर, हरभऱ्याबाबत कृषी विभागाचा सतर्कतेचा इशारा

तूर, हरभऱ्याबाबत कृषी विभागाचा सतर्कतेचा इशारा
तूर, हरभऱ्याबाबत कृषी विभागाचा सतर्कतेचा इशारा

पुणे : राज्यात यंदा तूर व हरभऱ्याचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजार व्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी सतर्क राहावे लागेल. उत्पादनानुसार खरेदी व्यवस्था उभारण्यासाठी योग्य पावले टाकावीत, असे कृषी आयुक्तालयाने पणन विभागाला सूचित केले आहे.  कृषी आयुक्तालय व पणन विभागाने कडधान्याचे यंदाचे उत्पादन आणि बाजार व्यवस्थेचा एका बैठकीत आढावा घेतला. कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रतापसिंह तसेच महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार या वेळी उपस्थित होते. राज्यातील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी १५ लाख ३३ हजार हेक्टरवर तुरीची लागवड करून २० लाख ३५ हजार टन उत्पादन घेतले होते. जादा उत्पादनामुळे हमीभावाने तुरीची खरेदी करताना शासनाची दमछाक झाली होती. राज्यभरात १५२ तूर खरेदी केंद्रांवरून ७७ लाख क्विंटल तुरीची खरेदी शासनाला करता आली. चालू हंगामात राज्यात १२ लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड झालेली आहे. लागवड जरी कमी दिसत असली तरी यंदा शेतकऱ्यांकडून किमान ११ लाख टन तूर विकण्यासाठी बाजारात आणली जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे खरेदी व्यवस्थेचे चांगले नियोजन करावे लागणार असल्याचे कृषी विभागाकडून पणन विभागाला सूचित करण्यात आले आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.  तुरीप्रमाणेच यंदा पणन विभागाला हरभऱ्याच्या खरेदी केंद्रांकडे जास्त लक्ष द्यावे लागेल, असेही पणन विभागाच्या लक्षात आणून देण्यात आले आहे. राज्याचे हरभरा लागवडीखालील सरासरी क्षेत्र १३ लाख हेक्टर असताना शेतकऱ्यांनी १९ लाख २० हजार हेक्टरवर हरभरा लावला आहे. त्यामुळे यंदा हरभऱ्याचे बंपर पीक अपेक्षित आहे. त्यामुळे हमीभावाने हरभरा खरेदी करण्याबाबत शासनाला नियोजन करावे लागेल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.  खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी तूर आणण्यापूर्वी शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. त्याबाबत जागृती होण्यासाठी एम-किसान पोर्टलवरून शेतकऱ्यांना माहिती पाठवावी, अशा सूचनादेखील आयुक्तांनी दिल्या आहेत. या वेळी विस्तार संचालक विजय घावटे, आत्माचे संचालक सुभाष खेमनार, कृषी सहसंचालक अनिल बनसोडे, पणन संचालनालयाचे सहसंचालक ए. एल. घोलकर यांनी चर्चेत भाग घेतला.  

राज्यात तुरीची १५९ केंद्रे उघडणार  गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा तुरीची उत्पादकता घटण्याची चिन्हे आहेत. हेक्टरी सरासरी १३.२७ क्विंटल तुरीची उत्पादकता गेल्या हंगामात होती. यंदा उत्पादकता ९ क्विंटल राहण्याची चिन्हे आहेत. तरीही तुरीचे एकूण उत्पादन राज्यात ११ लाख टनांच्या पुढे होण्याची शक्यता गृहीत धरून एकूण १५९ खरेदी केंद्रे उघडण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात आला आहे. एक फेब्रुवारीपासून राज्यात तुरीची खरेदी केंद्रे उघडतील व प्रत्यक्ष खरेदी पाच फेब्रुवारीपासून सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com