हरभरा दरात सुधारणांसाठी आयातशुल्क ६० टक्क्यांवर

हरभरा दरात सुधारणांसाठी आयातशुल्क ६० टक्क्यांवर
हरभरा दरात सुधारणांसाठी आयातशुल्क ६० टक्क्यांवर

मुंबई : देशांतर्गत हरभऱ्याचे दर पडल्याने शेतकरी अडचणीत आले होते. हरभरा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी व दर वाढावेत, यासाठी केंद्र सरकारने हरभरा आयात शुल्कात २० टक्के वाढ करण्याचा निर्णय गुरुवारी (ता.१) घेतला आहे. आता हरभऱ्यावरील आयात शुल्क ४० टक्क्यांवरून ६० टक्के झाले आहे. बाजारात हरभरा दर वाढावेत, यासाठी सरकारने तातडीने निर्णय घेत मागील तीन महिन्यांच्या आतच तिऱ्यांदा शुल्क वाढ केली आहे. यंदा महाराष्ट्रासह देशात हरभरा पेरणी वाढली आहे. उत्पादन जास्त होणार याचा अंदाज असल्याने हंगामाच्या सुरवातीलाच बाजारात दर हमीभावाच्याखाली अगदी ३४०० रुपयांपासून दर्जानुसार मिळत होते. पूर्ण हंगाम सुरू झाल्यानंतर जेव्हा बाजारात शेतकरी मोठ्या प्रमाणात माल आणतील तेव्हा दर आणखीनच खाली येतील, अशी भीती व्यक्त होत होती. त्यातच विदेशातून होणाऱ्या आयातीमुळे बाजारात आवक वाढून दर प्रभावित होतील, अशीही शक्यता होती. त्यामुळे सरकाने शेतकऱ्यांच्या मालाला दराचे संरक्षण मिळावे व विदेशातील आयात थांबवून देशातील दर वाढावेत, यासाठी आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

यंदा देशात हरभऱ्याचे बंपर उत्पादन होण्याचा अंदाज असल्याने बाजारात दर हमीभावाच्या खाली गेले होते. केंद्राने २०१७-१८ साठी हरभऱ्याला ४४०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला होता, तर बाजारात हमीभावापेक्षा ५०० ते ६०० रुपये कमी दर मिळत होता. कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा देशातील हरभरा उत्पादन १९ टकक्‍यांनी वाढून विक्रमी ११.१० दशलक्ष टन होणार आहे. मागील वर्षी देशात ९.३८ दशलक्ष टन उत्पादन झाले होते. भारत हा हरभरा उत्पादक; तसेच उपभोक्ता देश आहे आणि हरभरा डाळ ही भारतीयांच्या जेवणातील महत्त्वाची डाळ आहे. 

सरकारने हरभरा आयात शुल्कात वाढ करून आॅस्ट्रेलिया, कॅनडा आणि मेक्सिको या मोठ्या उत्पादक देशांमधून कमी दराने आयात होणाऱ्या डाळींना लगाम बसविण्याचे काम केले आहे. तसेच सरकारने गुरुवारी काबुली हरभऱ्यावर ४० टक्के आयात शुल्क लावले आहे.    अशी झाली आयात शुल्क वाढ देशात यंदा हरभरा उत्पादन वाढणार असल्याचा अंदाज येताच हंगामाच्या सुरवातीपासूनच सरकारने आयातीवर प्रतिबंध लावण्यास सुरवात केली. केंद्राने मागील तीन महिन्यांच्या आतच तीन वेळा आयात शुल्कात वाढ केली आहे. सरकारने या आधी डिसेंबर महिन्यात हरभरा आयात शुल्क ३० टक्के केले होते. फेब्रुवारी महिन्यात शुल्कात १० टक्के वाढ करून ४० टक्के केले होते. त्यानंतर गुरुवारी (ता.१) पुन्हा आयात शुल्कात २० टक्के वाढ करून ६० टक्के केले आहे.

पाशा पटेल यांची प्रतिक्रिया... आमच्या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारने हरभरा आयात शुल्कात २० टक्के वाढ केली आहे, तर पामतेलाच्या आयात शुल्कात १४ टक्के वाढ केली आहे. या निर्णयामुळे मी समाधानी आहे. सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे जे उद्दिष्ट ठेवले आहे, त्यासाठी सरकार करत असलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांचाच हा एक भाग आहे. यापूर्वीच अर्जेंटिना आणि मलेशिया या दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी आपल्या पंतप्रधानांकडे खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी करण्याची विनंती केली होती. तसेच कॅनडाच्या पंतप्रधानांनी वाटाण्यावरील आयात शुल्क कमी करण्याची मागणी केली होती; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठीच आयात शुल्क वाढीचा अतिशय योग्य निर्णय घेतला आहे. - पाशा पटेल, अ ध्यक्ष, राज्य कृषिमूल्य आयोग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com