सांगली जिल्ह्यात तुरीची काढणी सुरू

शासनाने तूर खरेदीच्या अडचणीत वाढ केली होती. याचा तोटा आजही आम्हाला सहन करावा लागतोय. यंदा तूर पिकासाठी हवामान अनुकूल नव्हते. त्यामुळे उत्पादनात १० टक्‍क्‍यांनी घट होणार आहे. मात्र गेल्या वर्षीपेक्षा यंदा दर वाढलीत अशी आशा आहे. - काळाप्पा पाटील, जालिहाळ खुर्द, ता. जत, जि. सांगली
तूर काढणी सुरु
तूर काढणी सुरु
सांगली ः जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणी झालेल्या तूर पिकाची काढणी सुरू झाली आहे. गेल्या वर्षी तूर खरेदीच्या गोंधळामुळे शेतकऱ्यांनी तूर पिकाच्या लागवडीकडे पाठ फिरवली होती. त्यातच पाण्याची टंचाईचा परिणामदेखील या पिकावर झाला. त्यामुळे क्षेत्रात सुमारे ४५०० हेक्‍टरने घट झाली. यंदाच्या हंगामात तुरीचे उत्पादन सुमारे सरासरी ४० टक्‍क्‍यांनी घटण्याची शक्‍यता असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.  
 
दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठे महांकाळ, तासगाव तालुक्‍यात तूर पीक प्रामुख्याने घेतले जाते. मात्र गेल्या वर्षी तूर खरेदी केंद्रावर त्याची विक्री करण्यासाठी अनेक अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक बाजारपेठेचा आधार घेतला होता. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. परिणामी, यंदाच्या खरीप हंगामात तूर पिकाचा पेरा कमी झाला. त्यातच पावसाने ओढ दिली. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली. भूजल पातळीत वाढ झाली नाही. खरीप हंगामात पेरणी केलेली तूर पाण्याअभावी वाळून गेली.
 
पाण्याची कमतरता आणि बदलते वातावरण यामुळे तूर पिकावर कीड - रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे तुरीचे उत्पादन कमी होण्याची शक्‍यता आहे. जत तालुक्‍यात सध्या आगाप पेरणी केलेल्या तुरीची काढणी सुरू झाली आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादकता ही कमी झाली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे.

तूर काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. गेल्या वर्षी केवळ सांगली येथील बाजार समितीत तूर खरेदी केंद्र सुरू केले होते. जिल्ह्यातील आटपाडी, जत, हे दोन तालुके सुमारे सांगलीपासून १०० किलोमीटर अंतरावर आहेत. यामुळे गेल्या वर्षी या भागातील शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी सांगली येथे येणे परवडत नव्हते.

परिणामी, शेतकऱ्यांना कमी दरात तुरीची विक्री करावी लागली होती. यंदाचा हंगाम सुरू झाला आहे. शासन या वेळी तूर खरेदी केंद्र सुरू करणार का? जत व आटपाडी तालुक्‍यांतील बाजार समितीत तूरखरेदी केंद्र सुरू होणार का, असा प्रश्‍न तूर उत्पादक शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. 

जत तालुक्‍यात पेरणीपासून पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. यामुळे तूर पिकाची अपेक्षित वाढ झाली नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पाणीटंचाई असल्याने काही शेतकऱ्यांनी तूर पिकावर नांगरदेखील फिरवले होते. मात्र या तालुक्‍यात सुमारे तुरीचे ३० टक्‍क्‍यांनी उत्पादन घटण्याची शक्‍यता आहे. वास्तविक पाहता एकरी उत्पादनही मोठी घट होणार असल्याची माहिती श्रीकृष्ण शिंदे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com