आदेश पोचले, खरेदी ठप्पच !

३० नोव्हेंबर २०१७ ला ऑनलाइन नोंदणी झाल्याचा मेसेज आला, पण तूर घेऊन या म्हणून अजून मेसेज आला नाही. चौकशी केली तर अजून पत्र नाही, खरेदी सुरू नसल्याचं फोनवर बाजार समितीकडून सांगितलं जातं. २६ मार्च २०१८ ला परळी बाजार समितीला याविषयी लेखी पत्र दिलं, पणं उत्तर काही मिळनां. खरेदी सुरू नाही अन्‌ नोंदणी असून घेऊन येण्याचा मेसेज नाही, ज्यांनी तरू घातली त्यांना पैसे नाही. कशी ऑनलाइन अन्‌ झटपट खरेदी म्हणावं. - धनंजय सोळंके, नागापूर, ता. परळी, जि. बीड.
तुर खेरदी
तुर खेरदी

औरंगाबाद : तूर खरेदीसाठीच्या मुदतवाढीचे आदेश अखेर सोमवारी (ता.२३) प्रत्येक जिल्हास्तरावर व तेथून केंद्रस्तरापर्यंत धडकले, परंतु अनेक केंद्रांवर तूर खरेदीसाठी जागाच नसल्याने तूर खरेदीच सुरू करता येणे शक्‍य झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवाय शेतकऱ्यांना आपला माल घेऊन या म्हणणारे एसएमएस मिळाले नसल्याने आपला माल केंद्रावर घेऊन जावा किंवा नाही, या विवंचनेत शेतकरी अडकले आहेत.   केंद्रीय कृषिमंत्र्यांनी तूर खरेदीसाठी पंधरवड्याची मुदतवाढ देण्याची घोषणा केली. घोषणेनंतर तिसऱ्या दिवशी आदेश प्रत्येक जिल्हास्तरावर पाठविले. सोमवारपासून प्रत्येक जिल्हास्तरावरून केंद्रस्तरावर सूचना देवूऊन तुरीची खरेदी सुरू करण्याचे सांगीतले गेले, परंतु प्रत्यक्षात अनेक केंद्रावर आधी खरेदी केलेल्या तुरीलाच साठवण्यासाठी जागा नसल्याने नव्याने खरेदी केल्या जाणाऱ्या तुरीची साठवण करावी तरी कुठे, या विवंचनेत मराठवाड्यातील बहुतांश केंद्रांवर तुरीची खरेदी प्रत्यक्षात सुरू करता येणे शक्‍य झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. जशी जागा उपलब्ध होईल तशी तूर खरेदी करण्याचे सांगितले जात असले, तरी यामध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची पारदर्शकपणे क्रमवारीने तूर खरेदी होईल की नाही, याविषयी शंका आहे.  दुसरीकडे आपला नंबर केव्हा येणार, याविषयी फोनवरून चौकशी करणाऱ्या शेतकऱ्यांना काही केंद्रावरून समाधानकारक उत्तर मिळत नाही किंवा काही ठिकाणांहून अजून आदेशच आले नसल्याचे सांगून मोकळे होण्याचा प्रयत्न केला जात असल्याची स्थिती आहे. जिल्हास्तरावर आदेश आले असताना ते केंद्रस्तरावर गेले नसतील का, वशिलेबाजी केली तर क्रमांक लागतो का, असा प्रश्न या निमित्ताने शेतकऱ्यांच्या मनात घर करून गेला आहे.   प्राप्त माहितीनुसार लातूर जिल्ह्यात ४० हजारांवर ,तर बीड जिल्ह्यात ३१ हजारांवर, उस्मानाबाद जिल्ह्यात १७ हजार ५०० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. लातूर जिल्ह्यात १३ हजार, बीड जिल्ह्यात १४ हजारांवर, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ११ हजार ४६३ शेतकऱ्यांचीच तूर खरेदी करण्यात आली. लातूर आणि  बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आधी खरेदी केलेला माल केंद्रावर पडून आहे. त्यामुळे अशा केंद्रावर जोवर जागा उपलब्ध होत नाही तोवर नव्याने तुरीची खरेदी सुरू होईल का हा प्रश्न आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com