मिरजगाव येथे यंत्रणा सुरळीत, मात्र खरेदी केंद्रावर शुकशुकाट

तूर खरेदी करण्याची आज (बुधवारी ता. १८) मुदत संपत आहे. मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे तूर पडून आहे. सरकारने ठरवल्याच्या उद्दिष्टानुसार पन्नास टक्केही तूर खरेदी झाली नाही. त्यात तीन दिवस ऑनलाइन यंत्रणा बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नाही. त्यामुळे तूर खरेदीची मुदत वाढवून मिळावी. - प्रशांत गायकवाड, सभापती, बाजार समिती, पारनेर, जि. नगर
मिरजगाव तूर खरेदी केंद्र
मिरजगाव तूर खरेदी केंद्र
नगर : तूर, हरभरा खरेदीसह अन्य बाबी ऑनलाइन करणारी यंत्रणा दोन-तीन दिवसांपासून बंद असल्यानंतर बुधवारी (ता.१८) शेवटच्या दिवशी सकाळी अकरा वाजता सुरू झाली. मात्र, शेतकऱ्यांना ‘एसएमएस’ गेले नसल्याने दुपारपर्यंत खरेदी केंद्रावर शुकशुकाटच होता. दुपारी तीननंतर काहीशी खरेदी सुरू झाली.
दरम्यान, अनेकांकडे तूर शिल्लक असल्याने नोंदणीला व खरेदीला मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
 
नाफेडतर्फे सुरू करण्यात आलेल्या तूर, हरभरा खरेदीसह अन्य बाबी ऑनलाइन करणाऱ्या चांदुर मार्ग (मुंबई) येथील ‘सर्व्हर’ यंत्रणा सोमवारी (ता. १६) जळाल्याने तूर, हरभरा खरेदीची ऑनलाइन यंत्रणा कोलमडली होती. बुधवारी सकाळी अकरा वाजता यंत्रणा सुरू झाली असल्याचे ऑनलाइन यंत्रणेचे काम करणाऱ्या "एनईएमएल'' (नॅशनल ई मार्केटिंग लि.) या संस्थेच्या समन्वयकाने सांगितले.
 
शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोदणी केलेली आहे, त्यांना तूर विक्रीसाठी केंद्रावर आणावी म्हणून `एसएमएस`' पाठवले जातात. मात्र तीन दिवस यंत्रणा बंद असल्याने `एसएमएस`' गेले नाहीत. त्यामुळे आज ऑनलाइन यंत्रणा सुरू झाली खरी, मात्र एसएमएस गेले नसल्याने दुपारपर्यंत जिल्ह्यामधील खरेदी केंद्रावर शुकशुकाट होता.
 
कर्जत, मिरजगाव भागात तुरीचे उत्पादन चांगले झाले 
आहे. शासनाने हमी खरेदी केंद्र सुरू केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. तीन महिन्यापासून सुरळीत खरेदी सुरू आहे. तीन दिवस ऑनलाईन बंद असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नाही. त्यामुळे मुदत वाढवून देण्याची मागणी करणार असल्याचे मिरजगाव (ता. कर्जत) येथील तूर खरेदी केंद्र चालक संपत बावडकर यांनी सांगितले.

नगर जिल्ह्यामध्ये २१ हजार हेक्‍टर क्षेत्रावर तुरीचे पीक घेतले. यंदा कृषी विभागाच्या अहवालानुसार हेक्‍टरी ११ क्विंटल ४० किलोनुसार तूर खरेदी केली. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये दहा खरेदी केंद्रावर बुधवारपर्यंत १ लाख १० हजार ६९० क्विंटल तूर खरेदी झाली. मात्र शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये प्रतिहेक्‍टरी अठरा ते वीस क्विंटलप्रमाणे जिल्हाभरात सुमारे पावणे चार लाख क्विंटलच्या जवळपास तुरीचे उत्पादन झाल्याचा अंदाज आहे. बाजारात आतापर्यंत साधारण ८० हजार ते एक लाख क्विंटल तुरीची विक्री झाली. अजूनही जिल्ह्यात सुमारे पावणेदोन लाख क्विंटलच्या जवळपास तूर शिल्लक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com