अकोला ः या हंगामात सुरवातीपासूनच रखडलेली तूर खरेदी पंधरा दिवसांची मुदतवाढ मिळूनही साठवणुकीसाठी जागेचा प्रश्न असल्याने फारशी झाली नाही. मंगळवारी (ता.१५) वाढीव मुदतही संपणार असून पुन्हा एकदा खरेदी प्रक्रिया थांबण्याची शक्यता अाहे. त्यातच वऱ्हाडातील सध्या असंख्य केंद्रांवर बारदाना संपलेला असल्याने खरेदी केवळ नावालाच सुरू होती. या सर्व प्रकारामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेला तूर खरेदीचा हंगाम अत्यंत संथगतीने सुरू अाहे. अाॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी सुमारे ४० ते ४५ टक्केच शेतकऱ्यांचा शेतीमाल यंत्रणेकडून खरेदी झालेला अाहे. अाता मात्र कुठेच साठवायला जागा नसल्याने मोजमाप अत्यंत धिम्यागतीने केले जात अाहे.
शासनाकडून तूर खरेदीसाठी एक मेपासून वाढीव मुदतवाढ देण्यात अाली होती. याची मर्यादा अाता मंगळवारी संपत अाहे. शासनाकडून मुदतवाढीच्या अनुषंगाने मागणी करण्यात अाल्याचे सांगितले जाते, परंतु नवा सुधारित अादेश अद्याप अालेला नाही. तो मंगळवारपूर्वी न अाल्यास खरेदी ठप्प होण्याची शक्यता अाहे. जिल्हा यंत्रणांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत लेखी पाठपुरावा केला जात अाहे.
नव्याने मिळालेल्या पंधरा दिवसांच्या मुदतवाढीत प्रामुख्याने खरेदी होणारा माल ठेवण्यासाठी जागेचा प्रश्न कायम अाहे. गेल्या वर्षातील तुरीची विल्हेवाट जोमाने लागत नसल्याने गोदाम थोडेही रिकामे झालेले नाहीत. खासगी गोदाम भाडेतत्त्वावर घेऊन खरेदी सुरू झाली. ते गोदामही भरले.
अाता नव्याने गोदाम शोधाशोध सुरू झालेली अाहे. खरीप हंगाम तोंडावर अाल्याने नोंदणी केलेले अनेक शेतकरी खुल्या बाजारांकडे नाईलाजाने जात अाहेत. बाजारांमध्ये तूर ३९०० ते ४२०० रुपये क्विंटल दरम्यान विकली जात अाहेत. सरासरी ४१०० रुपये क्विंटल असा दर शेतकऱ्यांच्या पदरात पडतो अाहे. हमीभावापेक्षा सुमारे १४०० रुपयांनी दर कमी अाहे.