औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी सुरू करण्यात आलेल्या पाच केंद्रांवर आतापर्यंत २७९८ शेतकऱ्यांची २४ हजार क्विटंल तूर खरेदी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य भाव मिळावा, यासाठी शासनाच्यावतीने तुरीची हमीभावाने खरेदी सुरू करण्यात आली. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी अनेक शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे बाकी असल्याने शासनाने खरेदीसाठी १५ मे पर्यंत मुदतवाढ दिली. यामुळे खरेदीविना पडून असलेली तूर विक्रीसाठी येऊ लागली आहे.
तुरीचे विक्रमी उत्पादन झाले होते, मात्र अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, यासाठी शासनाने नाफेडच्या माध्यामतून तूर खेरदी करण्याचा निर्णय घेतला होता. या ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या व्यवहारास शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला होता. फेब्रुवारीपासून सुरू झालेली ऑनलाइन तूर खरेदी १८ एप्रिलपर्यंत सुरू होती.
यानंतरही मोठ्या प्रमाणावर तूर पडून होती. शासनाने हस्तक्षेप केल्यानंतरही बाजारातील तुरीचे दर सुधारत नसल्याने शासनाने खरेदीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली. त्यामूळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हमीभावाने तुर खरेदीसाठी पुन्हा १५ मेपर्यंतची मुदत वाढविण्यात आली. पुन्हा एक मे पासून तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.
शनिवारपर्यंत (ता. ५) २४ हजार ८०६ क्विंटल तुरीची हमीभावाने खरेदी करण्यात आली आहे. १३ कोटी ४८ लाख ३०० रुपयांची ही तूर खरेदी झाली आहे. तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मेसेज पाठविण्यात आला असून तुरीची खरेदी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.