जळगाव : जिल्ह्यात येत्या बुधवारी (ता.१८ एप्रिल) तूर खरेदी प्रक्रिया बंद होण्याची शक्यता असून, आतापर्यंत ४३ हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे. तूर व हरभरा खरेदीसंबंधीचे चुकारे शेतकऱ्यांना वितरित केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, जळगाव, अमळनेर, चोपडा, चाळीसगाव या नऊ केंद्रांवर तूर खरेदी सुरू झाली होती. यातील अमळनेर व मुक्ताईनगर, जामनेर केंद्र सुरवातीला सुरू झाले. जळगाव, चोपडा येथील केंद्र उशिराने सुरू झाले. या केंद्रांमध्ये मिळून ४३ हजार ४६ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. सुमारे चार तूर खरेदी केंद्रांमध्ये सध्या हवा तसा प्रतिसाद नसल्याने या केंद्रात खरेदी सध्या सुरू नाही. परंतु ही केंद्रे बंद नाहीत. शेतकरी तूर विक्रीसाठी आले तर नोंदणी करून त्यांची तूर खरदी केली जाईल. १८ एप्रिलला तूर खरेदी बंद करण्याचे आदेश आहेत. परंतु शासन नवा निर्णयही घेऊ शकते, अशी माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. यातील भडगाव, यावल, रावेर व पाचोरा ही चार केंद्र सुरू झाली आहेत. पारोळा, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा, जळगाव येथे हरभरा खरेदी सुरूच झालेली नाही. चार खरेदी केंद्रांमध्ये ३४०० क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे.
खासगी बाजार किंवा बाजार समितींमध्ये हरभऱ्यासह तुरीला अपेक्षित दर नाहीत. दरांवर दबाव आहे. हरभऱ्याची आवक अधिक आहे. जिल्ह्यात यंदा हरभरा पेरणी अधिक झाली होती. त्यामुळे आवकही अधिक असून, आवक झालेल्या हरभऱ्याचे लिलावही होत नाही. आठ ते १० दिवसांत जळगाव बाजार समितीत लिलाव होतात, मग शेतकऱ्यांना पैसे दिले जातात, असे प्रकार सुरू आहेत. शासकीय खरेदी व्यापक व वेळेत राहिली असती तर चित्र वेगळे दिसले असते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.