उस्मानाबाद : जिल्ह्यात वाढीव मुदत संपेपर्यंत १२ हजार ९८० शेतकऱ्यांच्या तुरीची हमीभावाने खरेदी केली गेली. एकूण १ लाख ६० हजार क्विंटल तूर खरेदी केली गेली असून, जवळपास ५० टक्के चुकारे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उस्मानाबाद जिल्ह्यात शासनाने हमी दराने तुरीची खरेदी करण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू केली होती. या प्रक्रियेत सहभागी होत १७ हजार ९०८ शेतकऱ्यांनी तुरीच्या हमी दराने खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केली. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी १५ हजार ७१४ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले होते. एसएमएस पाठविलेल्या शेतकऱ्यांपैकी दिलेल्या
मुदतीत केवळ १२ हजार ९८० शेतकऱ्यांच्या १ लाख ६० हजार क्विंटल तुरीची हमी दराने खरेदी करणे यंत्रणेला शक्य झाले.
खरेदी केलेल्या तुरीपैकी जवळपास ५० टक्के चुकारे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. एसएमएस मिळूनही २७३४ शेतकऱ्यांच्या तुरीची हमी दराने खरेदी करणे शक्य झाले नाही. शिवाय २ हजार १९४ शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरही एसएमएसची वाट पाहावी लागली; परंतु मुदत संपल्यानंतरही एसएमएस मिळाला नाही. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी केलेल्या मात्र एसएमएस न मिळालेल्या किंवा एसएमएस मिळूनही तुरीची खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी केली जाणार का, खरेदी केली तर त्यांचे चुकारे शेतकऱ्यांना किमान पेरणीपूर्वी मिळणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.