जळगाव : जिल्ह्यात तूर खरेदी बऱ्यापैकी झालेली असली, तरी सुमारे २७ हजार क्विंटल तूर विक्रीपोटीचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात नाफेड अपयशी ठरले आहे. निधी मिळालेला नसल्याने या अडचणी आल्या आहेत; परंतु या आठवड्यात ९० टक्के रखडलेले चुकारे दिले जातील. तूर खरेदीची शासकीय मुदत बुधवारी (ता. १८) संपणार असल्याची माहिती मिळाली आहे.
जिल्ह्यात जामनेर, मुक्ताईनगर, रावेर, जळगाव, चोपडा व अमळनेरच्या तूर खरेदी केंद्राला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत ३९ हजार ३७५ क्विंटल तूर खरेदी झाली असून, या तूर खरेदीपोटीचे सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांचे चुकारे नाफेडडून प्राप्त झालेले नाहीत. ३५०१ शेतकऱ्यांची तूर खरेदी केली आहे. परंतु जसजशी तूर खरेदीसंबंधीची प्रक्रिया मंद होईल, शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी होईल, त्यानुसार जेथे तूर खरेदी सुरू होती, तेथेच हरभरा खरेदी सुरू होणार असल्याची माहिती मिळाली.
जिल्ह्यात जामनेर, मुक्ताईनगर, रावेर, जळगाव, चोपडा, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव व जळगाव येथे तूर खरेदी सुरू आहे. तूर खरेदीसाठी येथे नऊ केंद्रे आहेत.
या नऊ केंद्रांशिवाय भडगाव, यावल आणि पारोळा येथे हरभरा खरेदी केंद्रे सुरू करायची आहेत. यातील फक्त भडगाव येथील हरभरा खरेदी केंद्र सुरू असून, या केंद्रात सुमारे २५० क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे.
उर्वरित ११ खरेदी केंद्रांपैकी रावेरचे केंद्र याच आठवड्यात सुरू करण्याचे नियोजन मार्केटिंग फेडरेशनने केले आहे. तूर खरेदी सुरू असून, मागील वर्षाची व यंदाची अशी तूर गोदामांमध्ये साठविली आहे. गोदामे भरल्याने नव्याने तूर खरेदीला वाव नाही. कारण तूर साठवणुकीसाठी इतर जिल्ह्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. अशात जोपर्यंत तूर खरेदीचा प्रतिसाद कमी होणार तोपर्यंत हरभरा खरेदी सुरू करता येणार नाही, अशी अडचण नाफेडसमोर आहे.