नगर ः शेतकऱ्यांची व्यापाऱ्याकडून होणारी लूट थांबविण्यासाठी हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी सुरू केलेले कर्जत येथील तूर खरेदी केंद्र बुधवारी (ता. ७) अचानक बंद करण्यात आले. येथे तूर विक्रीसाठी सुमारे अठराशेवर शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील अजून बाराशेवर शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे बाकी असताना जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश दिले. प्रधान कार्यालयाच्या आदेशाने खरेदी केंद्र बंद केल्याचे सांगण्यात आले आहे. खरेदी केंद्र अचानक बंद केल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांची मात्र मोठी अडचण झाली आहे.
जिल्ह्यात तूर खरेदीचा प्रश्न गेल्या वर्षीपासून सातत्याने चर्चेत आहे. यंदाही तुरीची बऱ्यापैकी उत्पादन झालेले असल्यामुळे बाजारात आवक वाढली आहे. मात्र, व्यापाऱ्यांकडून हमी दरापेक्षा कमी दराने खरेदी केली जात असल्यामुळे नाफेडमार्फत हमीभावाने तुरीची खरेदी करण्यासाठी यंदाही जिल्ह्यामध्ये नऊ ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सरकारी खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणीही केलेली आहे. खरेदी केंद्रे सुरळीत सुरू असताना बुधवारी कर्जत येथील तूर खरेदी केंद्र बंद करण्याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी भारत पाटील यांनी केंद्र चालकास पत्र दिले.
अचानक झालेल्या या निर्णयामुळे शेतकरीही अवाक झाले आहेत. येथे तूर विक्री करण्यासाठी आतापर्यंत सुमारे एक हजार आठशे शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यातील साधारण पाचशे शेतकऱ्यांची तूर हमी दराने खरेदीही झाली आहे. अजूनही अनेक शेतकरी येथे तूर विक्री करण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
अचानक खरेदी केंद्र बंद झाल्याने येथे तूर विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना परत जावे लागले. विक्रीसाठी तूर आणण्याचा संदेश आल्यावर तालुक्याच्या दूरवरच्या भागातून शेतकरी येथे तूर विक्रीसाठी आले, मात्र खरेदी केंद्र बंद झाल्याचे कळल्यावर आता वाहतुकीचा नाहक भुर्दंड सोसावा लागणार आहे.