औरंगाबाद : हमीभावाने तूर खरेदीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या तूर खरेदीला साठवणुकीच्या जागेअभावी ब्रेक लागला आहे. लातूर जिल्ह्यात दहापैकी केवळ तीन खरेदी केंद्र शुक्रवारी (ता. ३०) सुरू होती तर बीड जिल्ह्यात १५ पैकी केवळ सहा केंद्रांवरच तुरीची खरेदी झाली. जेथे जागेचा प्रश्न सुटला आहे त्याच केंद्रावर खरेदी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद हे जिल्हे तुरीचे आगर म्हणून प्रसिद्ध आहेत. बाजारातील दर पडल्याने शासनाने हमी दराने तुरीची खरेदी केंद्रे सुरू केली. लातूर जिल्ह्यात १० केंद्रावरून १० हजार ४२४ शेतकऱ्यांची १ लाख १० हजार ९७ क्विंटल तुरीची खरेदी केली गेली.
गतवर्षी खरेदी केलेली तूर व इतर शेतीमाल गोदामांमध्ये साठवलेला असल्याने यंदा तूर खरेदीत जागेचा प्रश्न भेडसावेल हे स्पष्ट होते. लातूर जिल्ह्यात शुक्रवारी त्याचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. साठवणुकीच्या जागेअभावी जिल्ह्यातील १० पैकी केवळ ३ खरेदी केंद्रांवरच तुरीची खरेदी करणे शक्य झाले. लातूर जिल्ह्यात खरेदी केलेल्या एकूण तुरीपैकी ५५ हजार ३४१ क्विंटल तुरीला साठवणुकीसाठी जागाच मिळाली नाही. त्यामुळे ही तूर संबंधित खरेदी केंद्रावरच पडून आहे.
बीड जिल्ह्यातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. बीड जिल्ह्यात शुक्रवारी १५ पैकी केवळ सहा खरेदी केंद्रावरच तुरीची खरेदी करणे शक्य झाली. बीड जिल्ह्यात शनिवारपर्यंत (ता. ३१) पंधरा खरेदी केंद्रावरून १० हजार ५६७ शेतकऱ्यांची १ लाख १५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यापैकी तब्बल ५७ हजार ९०६ क्विंटल तूर अजूनही खरेदी केलेल्या केंद्रावरच पडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तुरीच्या खरेदीला साठवणुकीसाठी जागाच नसल्याने ब्रेक लागला असून हरभऱ्याच्या खरेदीलाही याच कारणाने विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. गोदामात साठवणूक न होण्याने शेतकऱ्यांना विक्री केलेल्या शेतीमालाचे चुकारेही मिळण्यात अडथळा निर्माण झाला आहे.