जळगाव ः वखार महामंडळाची गोदामे नसल्याने जिल्ह्यातील तूर खरेदी रखडतच सुरू असून, काही केंद्रांवर रोजच्या खरेदीची अल्प मर्यादा ठरविली जात आहे. तसेच मंजूर झालेल्या १२ खरेदी केंद्रांपैकी फक्त भडगाव येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू झाले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ३१ हजार क्विंटल तूर खरेदी झाली असून, यातील फक्त २० टक्के तूर खरेदीपोटीचे चुकारे शेतकऱ्यांना दिले आहेत. उर्वरित चुकारे देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दोन-तीन दिवसांत सर्वांना चुकारे दिले जातील, असा दावा मार्केटींग फेडरेशनने केला आहे.
नऊ ठिकाणी तूर खरेदी सुरू असून, त्यात रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर, जळगाव, चोपडा या केंद्रांचा समावेश आहे. मागील वर्षी जे धान्य शासकीय योजनेतून खरेदी केले ते वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये पडून आहे.
यंदा खरेदी केलेली तूर व इतर धान्याची त्यात भर पडली असून, यामुळे गोदामे भरली आहे. धान्य ठेवायला जागा नाही. मार्केटिंग फेडरेशन गोदामांची शोधाशोध करीत असून, सटाणा (जि. नाशिक) व नवापूर (जि. नंदुरबार) येथे खरेदी केलेले धान्य साठविण्याची तयारी सुरू आहे.
जेथे सध्या तूर खरेदी सुरू आहेत, त्याच केंद्रात हरभरा खरेदीसही मंजुरी मिळाली असून, पारोळा, भडगाव आणि यावल येथेही हरभरा खरेदीस मंजुरी आहे. यात ज्या नऊ केंद्रांवर सध्या तूर खरेदी सुरू आहे, तेथे हरभरा खरेदी सुरू झालेली नाही. कारण तुरीसह हरभरा खरेदी सुरू केली, तर यंत्रणेवर ताण वाढेल, धान्य साठविण्यास जागा राहणार नाही.
हरभरा खरेदीसाठी फक्त भडगाव येथे मागील आठवड्यात केंद्र सुरू केले आहे. उर्वरित केंद्रे गोदामे उपलब्ध झाल्यानंतर व तुरीची आवक कमी झाल्यावर सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात या हंगामात हरभऱ्याची पेरणी अधिक झाली आहे. परंतु बाजारात दर कमी असल्याने शासकीय खरेदी केंद्रांवरील अवलंबित्व वाढले आहे. परंतु एकच खरेदी केंद्र असल्याने शेतकऱ्यांना खासगी बाजारात हरभरा विक्री करावी लागत आहे.