अकोला ः हमीभाव खरेदी केंद्रावर खरेदी करणारा व गोदामात साठवणूक करणारा ग्रेडर या वर्षी एकच राहणार, असे खुद्द पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी अकोल्यात जाहीर केले. मात्र त्यांचे हे वक्तव्यच ठरले असून, सर्वत्र दोन ग्रेडर नेमण्यात अाल्याचे समोर अाले अाहे. मागील हंगामाप्रमाणे पुन्हा एकदा एकाने मंजूर केलेली तूर दुसऱ्या ग्रेडरकडून परत केली जात असल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यात समोर आला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता वाढली अाहे.
गेल्या हंगामात हमीभाव खरेदी केंद्रावर धान्य खरेदी करताना प्रचंड गोंधळ उडाला होता. त्यातच हमीभावाने खरेदी करून साठवणुकीसाठी पाठवलेले धान्य गोदामावर कार्यरत असणाऱ्या ग्रेडरकडून परत पाठवले जात होते. विविध जिल्ह्यांमध्ये यामुळे पेच तयार झाले. अद्यापही काही ठिकाणच्या अशा धान्याची विल्हेवाट लागलेली नाही. याही हंगामात अाता पुन्हा हाच प्रकार सुरू झाला अाहे.
सध्या नाफेडमार्फत तूर खरेदी केली जात असून, काही ठिकाणी खरेदी झालेली तूर साठवणुकीसाठी पाठवल्यानंतर गोदामावरील ग्रेडरकडून परत केली जात अाहे. या अाठवड्यात अकोला जिल्ह्यात बार्शीटाकळी व तेल्हारा तालुक्यात अशा घटना समोर अाल्या अाहेत. सुमारे दोन हजारपेक्षा अधिक तुरीचे पोती परत करण्यात अाल्याचा प्रकार समोर अाला अाहे. परत केलेली तूर ही एफएक्यू दर्जाची नसल्याचा शेरा गोदामावरील ग्रेडरने दिला अाहे.
जर ही तूर एफएक्यू दर्जाची नव्हती, तर खरेदी केंद्रावरील ग्रेडरकडून मंजूर कशी केली गेली. नाफेडच्या ग्रेडरने निकषानुसार तूर खरेदी केली असेल तर कंपनीच्या ग्रेडरकडून परत करण्याचे गौडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला अाहे. दोन ग्रेडरच्या मूल्यांकनात असा कुठला फरक अाहे जो एक सकारात्मक व दुसरा नकारात्मक शेरा देतो, असेही शेतकरी विचारत अाहेत.
अकोल्यात तूर खरेदी केंद्राचे उद् घाटन करण्यासाठी पणनमंत्री सुभाष देशमुख २ फेब्रुवारीला अाले होते. या वेळी केंद्राचे उदघाटन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या वर्षी अनेक ठिकाणी हमीभाव केंद्रावर खरेदी झालेली तूर गोदामावर असलेल्या ग्रेडरकडून परत पाठवली गेली होती. यामुळे ठिकठिकाणी अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर या वेळी एकच ग्रेडर नेमला जाईल, असे त्यांनी सांगितले.