जळगाव : जिल्ह्यात सर्व नऊ तूर खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. या केंद्रांवर मिळून सहा हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली असून, खरेदीबाबत चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच येत्या १५ तारखेपासून हरभऱ्याची खरेदीही नाफेड सुरू करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्ह्यात १५ फेब्रुवारीपर्यंत फक्त चारच तूर खरेदी केंद्रे सुरू झाली होती. त्यात अमळनेर, जामनेर, बोदवड व मुक्ताईनगरचा समावेश होता. उर्वरित पाच खरेदी केंद्रे मागील आठवड्यात सुरू झाली आहेत.
त्यात पाचोरा, चाळीसगाव, जळगाव, चोपडा, रावेर या केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांपैकी सर्वाधिक तूर खरेदी अमळनेर येथील केंद्रात झाली आहे. यापाठोपाठ जामनेर, मुक्ताईनगर, रावेर येथील केंद्रांमध्येदेखील तूर खरेदी झाली आहे.
६५० शेतकऱ्यांच्या सहा हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली असून, आठवडाभरात थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर चुकारे जमा केले जात असल्याची माहिती मिळाली. चुकारे थकलेले नाहीत, असा दावा करण्यात आला. तूर खरेदीबाबत आणखी केंद्रे वाढविण्याची शक्यता मात्र नाही. कारण ज्या भागात तुरीचे उत्पादन चांगले आहे, त्या भागात खरेदी केंद्रे सुरू केली आहेत.
येत्या १५ मार्चपासून नाफेडतर्फे हरभऱ्याची खरेदीदेखील केली जाण्याची शक्यता आहे; परंतु याबाबत अजून मार्गदर्शक सूचना, स्पष्ट आदेश शासन किंवा नाफेडकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत. हरभऱ्याची खरेदी ४४०० रुपये क्विंटल या दरात होऊ शकते; परंतु काबुली हरभरा व इतर प्रकारच्या हरभऱ्याचे दर कसे राहतील, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.