नगर ः जिल्ह्यात ‘नाफेड’ मार्फत सुरू करण्यात आलेल्या दहा खरेदी केंद्रावर आतापर्यंत २० कोटी ८५ लाख ७६ हजार ९५० रुपये किमतीची ३८ हजार २७१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. आठ दिवसांपासून कर्जतचे केंद्र बंद झाले असून, सध्या नऊ केंद्रे सुरू आहेत, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी भारत पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यात गतवर्षी तूर खरेदीचा प्रश्न गंभीर झाला होता. केवळ कृषी विभागाने तूर उत्पादनाचा योग्य अहवाल दिला नसल्याने ऐनवेळी खरेदीचा प्रश्न निर्माण झाल्याचा ठपका ठेवला होता. त्यामुळे यंदा कृषी विभागाने सावध पवित्रा घेतला. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार जिल्ह्यामध्ये ५,४५० रुपये क्विंटल दराने नाफेडने सुरू केलेल्या खरेदी केंद्रावर तुरीची खरेदी सुरू आहे.
सुरवातीला नगर, जामखेड, नेवासा, पारनेर, वांबोरी (राहुरी), कर्जत, शेवगाव, श्रीरामपूर, मिरजगाव या नऊ ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरू केले होते. आतापर्यंत या नऊ केंद्रांवर २० कोटी ८५ लाख ७६ हजार ९५० रुपये किमतीची ३८ हजार २७१ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. आठ दिवसांपासून कर्जत येथील तूर खरेदी केंद्र बंद आहे. मात्र, श्रीगोंदा येथे केंद्र सुरू केल्याने जिल्ह्यामध्ये सध्या नऊ केंद्रांवर तुरीची खरेदी सुरू आहे.
आतापर्यंत ३९०० शेतकऱ्यांनी तुरीची विक्री केल्याचे सांगण्यात आले. यंदा हेक्टरी ११ क्विंटल २२ किलो तुरीचे उत्पादन झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. त्यानुसार एका शेतकऱ्याकडून एकरी चार क्विटंल ११ किलोप्रमाणे तूर खरेदी केली जात आहे. त्यासाठी सात-बारा उताऱ्यावरील तलाठ्याने केलेली तूर पिकाची नोंद पाहिली जात आहे. यंदा साधारण ७० हजार क्विंटल (उत्पादनाच्या २५ टक्के) तूर हमीभाव केंद्रावर खरेदी होईल, असे जिल्हा पणन अधिकारी पाटील यांनी सांगितले.
ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना तूर विक्री करण्याबाबत मोबाईलवर संदेश मिळत आहेत. आतापर्यंत ११ हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे.