नगर ः जिल्ह्यात आतापर्यंत दहा शासकीय खरेदी केंद्रांवर ८५ हजार १०० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. ८९०४ शेतकऱ्यांनी तूर विक्री केली असून, ऑनलाईन नोंदणी केल्यानुसार अजून जवळपास ४ हजार शेतकऱ्यांची तूर विक्री बाकी आहे. या खरेदी केलेल्या तुरीची रक्कम सुमारे ४६ कोटी ३७ लाख आहे. अजून अनेक शेतकऱ्यांना चुकारे मिळाले नाहीत. किती शेतकऱ्यांना चुकारे मिळाले नाहीत याचा आकडा मात्र मार्केटिंग फेडरेशनकडे नाही.
बाजारात व्यापारी तुरीची कमी दराने खरेदी करत असल्यामुळे हमीभावाने शेतकऱ्यांची तूर खरेदी करता यावी यासाठी सर्वस्तरातून झालेल्या मागणीनुसार जिल्ह्यामध्ये ११ खरेदी केंद्रे सुरू झाली. त्यातील कर्जत येथील एक केंद्र अचानक बंद करण्यात आले. सध्या दहा केंद्रे सुरू आहेत. ५४५० रुपये प्रतिक्विंटल दराने ‘नाफेड’कडून तूर खरेदी सुरू आहे. आतापर्यंत ४६ कोटी ३७ लाख रुपयांची ८५ हजार १०० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. ८९०४ शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली असल्याचे सांगण्यात आले.
यंदा हेक्टरी ११ क्विंटल २२ किलो तुरीचे उत्पादन झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. त्यानुसार एका शेतकऱ्याकडून एकरी चार क्विंटल ११ किलोप्रमाणे तूर खरेदी केली जात आहे. आतापर्यंत १२ हजार ८६६ शेतकऱ्यांनी तूरविक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. सुरवातीला तूर विक्री केलेल्या अनेक शेतकऱ्यांना मात्र अजूनही चुकारे मिळालेले नाहीत. नेमक्या किती शेतकऱ्यांना तुरीची पैसे मिळाले याचा आकडा मार्केटिंग फेडरेशनकडे नाही.