औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद व जालना या चार जिल्ह्यांतील ३२ खरेदी केंद्रांवरून १२ हजार ९०१ शेतकऱ्यांची १ लाख ३० हजार ८०२ क्विंटल तूर हमीभावाने खरेदी करण्यात आली आहे. जसजशी तूर खरेदीला गती येत आहे, तसतसा तूर साठवणुकीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीची पाच केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांमध्ये आजवर २८६८ शेतकऱ्यांनी हमीभावाने तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. या शेतकऱ्यांपैकी १०५७ शेतकऱ्यांच्या ९ हजार १४ क्विंटल ५० किलो तुरीची खरेदी करण्यात आली आहे. दुसरीकडे जालना जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीची आठ केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांवरून १४०६ शेतकऱ्यांकडून १२ हजार ७१५ क्विंटल ५० किलो तूर खरेदी करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यात तुरीची सर्वाधिक आवक होत असते. यंदा कर्नाटकातून येणाऱ्या तुरीची आवक आपल्यापेक्षा त्याभागात अधिकचे दर मिळत असल्याने जवळपास बंद झाली होती. प्राप्त माहितीनुसार लातूर जिल्ह्यात हमीभावाने तुरीची खरेदी करण्यासाठी दहा केंद्रे सुरू करण्यात आली होती. या केंद्रांवरून ६४३८ शेतकऱ्यांची ६४ हजार ६७२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. खरेदी करण्यात आलेल्या तुरीपैकी तब्बल ३८ हजार ९२० क्विंटल तूर जागेअभावी गोडाऊनमध्ये साठविणे बाकी आहे. त्यामुळे जागेच्या प्रश्नाने लातुरातही डोके वर काढले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात तूर खरेदीची ९ केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांवरून ४ हजारांवर शेतकऱ्यांची ४४ हजार ४०० क्विंटल तूर हमीभावाने खरेदी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद व लातूर या चार जिल्ह्यांतील ३२ खरेदी केंद्रांवरून १ लाख ३० हजार ८०२ क्विंटल तुरीची हमीभावाने खरेदी करण्यात आल्याची माहिती चारही जिल्ह्यांतील मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दिली.