यवतमाळ : मागील वर्षीपासून तूर खरेदीच्या अडचणी कायम आहे. यंदाही अडचणी संपलेल्या नाहीत. शासकीय आदेशाप्रमाणे मोजकेच दिवस तूर खरेदीसाठी शिल्लक असतानाच आता जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व केंद्रीय वखार महामंडळाचे गोदाम फुल्ल झाले आहे. त्यामुळे तूर साठवणुकीसाठी जागेचे नवे संकट उभे राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून तुरीचे समाधानकारक उत्पादन झाले आहे. मात्र, तूर विक्री करताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांना तूर विक्री करताना नाकी नऊ आले होते. त्यातून धडा घेत नियोजन केल्या जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, यंदाही नियोजनाचा अभाव दिसून येत आहे.
जिल्ह्यात नाफेडने खरेदी केलेली तूर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात साठवणूक केली जाते. राज्य वखार महामंडळाचे गोदामाची साठवण क्षमता १३ हजार १२० मेट्रिक टन आहे. त्यापैकी दहा हजार मेट्रिक टन जागा भारतीय खाद्य निगमकरिता राखीव आहे. उर्वरीत जागेत सीसीआय, इतर एजन्सीचा माल ठेवण्यात येतो. राज्य वखार महामंडळाकडे सध्या पाचशे टन तूर साठवणूक करता येईल, इतकीच जागा शिल्लक आहे. लवकरच ही जागा ‘फुल’ होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय वखार महामंडळाचे तीन गोदाम आहे. हे तीन गोदामे आधीच पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसांत नाफेडच्या खरेदी केंद्रावर घेतलेली तूर साठवणूक करण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्य वखार महामंडळाने आठ गोदामे भाडेतत्त्वावर घेतली आहेत. त्या गोदामातही साठवूण झाली आहे. परिणामी, आता साठवणुकीची नवी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्य वखार महामंडळाच्या गोदामात मागील वर्षीची साडेतीन हजार टन तूर साठवलेली आहे. केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामातही मागील वर्षीची तूर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे यंदा तूर ठेवण्याची अडचण आल्यास त्यांचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.