तूर खरेदीचं घोडं अडलेलंच

तूर खरेदीचं घोडं अडलेलंच

औरंगाबाद : तूर खरेदीचं घोडं मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत अडलेलंच राहणार हे स्पष्ट आहे. मंगळवारी (ता. १५) खरेदीसाठी दिलेली वाढीव मुदत संपणार असतानाच, लातूर जिल्ह्यातील सात खरेदी केंद्रांवरील तुरीची खरेदी बारदान्याअभावी थांबली आहे. बीड जिल्ह्यातही खरेदी केलेल्या तुरीला साठवायला जागा नसून, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या व प्रत्यक्ष तूर खरेदी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या पाहता वाढीव मुदतीनंतरही तुरीची हमीदराने खरेदीची शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम राहण्याचीच शक्‍यता जास्त आहे.  मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद आदी जिल्हे तुरीचे आगर म्हणून ओळखले जातात. बाजारात तुरीचे दर पडलेले असल्याने शासनाने हस्तक्षेप करून तुरीची हमी दराने खरेदी सुरू केली. परंतु या हस्तक्षेपाचा ना तुरीचे खासगीतील दर वाढण्यावर परिणाम झाला ना हरभऱ्यावर. लातूर जिल्ह्यात तुरीच्या हमी दराने खरेदीसाठी सुरू करण्यात आलेल्या केंद्रांपैकी औसा, निलंगा, देवणी, चाकूर, रेणापूर, जळकोट आदी केंद्रावरील तुरीची हमीदराने सुरू असलेली खरेदी बारदान्याअभावी थांबल्याची माहिती सूत्रांनी दिली.  लातूर जिल्ह्यात जवळपास चाळीस हजार शेतकऱ्यांनी तुरीच्या हमीदराने खरेदीसाठी नोंदणी केली होती. लातुरात जागेच्या  प्रश्नापाठोपाठ बारदान्याचा प्रश्न उभा राहिल्याने विहित मुदतीत बाकी असलेल्या जवळपास वीस हजार शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी करावी कशी, असा प्रश्न यंत्रणेसमोर आहे. महिनाभरापासून तुरीसाठी सहा लाख पोती व हरभऱ्यासाठी किमान वीस लाख बारदाना मिळावा म्हणून पाठपुरावा करण्यात आला. परंतु बारदाना न मिळाल्याने खरेदी थांबल्याची माहिती यंत्रणेतील सूत्रांनी दिली. २७०० शेतकऱ्यांच्या ३५ हजार क्‍विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली असली, तरी ३२ हजारांवर हरभऱ्यासाठी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचीही खरेदी बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले.  बीड जिल्ह्यात ३२ हजार ५१९ शेतकऱ्यांनी तुरीच्या हमी दराने खरेदीसाठी ऑनलाउन नोंदणी केली होती. त्यापैकी २० हजार ३७३ शेतकऱ्यांची २ लाख ४ हजार ९७४ क्‍विंटल तुरीची हमीदराने खरेदी करण्यात आली. १२ हजार १४६ शेतकऱ्यांची अजूनही तूर खरेदी करणे बाकी आहे. बारदान्याचा प्रश्न निस्तारलेल्या बीड जिल्ह्यात साठवणुकीचा प्रश्न सर्वांत गंभीर असून, १ लाख ३ हजार ३८४ क्‍विंटल तुरीला साठविण्यासाठी जागा नाही. ३९९६ शेतकऱ्यांचा ५२ हजार २४९ क्‍विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. त्यापैकी ३७ हजार १५१ क्‍विंटल जागेअभावी अजूनही केंद्रांवर उघड्यावर पडून आहे.   जालना जिल्ह्यात तुरीची हमीदराने खरेदीची आठ केंद्रे सुरू करण्यात आली होती. या केंद्रांवरून ८७२५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. यापैकी ७८८३ शेतकऱ्यांनी एसएमएस पाठविण्यात आले. त्यापैकी ४९११ शेतकऱ्यांची ४५ हजार १९४ क्विंटल ५० किलो तूर खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या तुरीपैकी ३४३३ शेतकऱ्यांना १६ कोटी ९० लाख ६८ हजार रुपयांचे चुकारे देण्यात आले. जवळपास एक हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तूर उत्पादकांना अद्यापही आशा १८ एप्रिलपर्यंत मुदत असलेल्या हमीदराने तूर खरेदीला २३ एप्रिलला मुदतवाढ देण्यात आली. प्रत्यक्षात अनेक केंद्रांवर २४ ते २५ एप्रीलला काम सुरू झाले. त्यामुळे मुदतवाढ जरी पंधरा दिवसांची दिसत असली, तरी प्रत्यक्षात किती दिवस खरेदी झाली हा प्रश्न आहे. त्यामुळे आता नव्याने मुदतवाढ मिळते की नाही याकडे नोंदणी केलेल्या, मात्र हमीदराने खरेदी न झालेल्या तूर उत्पादकांचे लक्ष लागले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com