तूर खरेदी अडकली नोंदणीतच

हमीभावाने खरेदी केंद्र सुरू केले तर बाजारपेठेवर परिणाम होईल हे खरे आहे; पण शासनाच्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षीचा वाईट अनुभव माझ्या पाठीशी आहे. शासनाचे धोरण चांगले आहे; पण राबविणारे चुकीचे आहेत. - नंदकुमार चामले, शेतकरी, धनेगाव, ता. लातूर
सध्या बाजारपेठेत तुरीची आवक कमी असतानादेखील हमीभाव मिळत नाही.
सध्या बाजारपेठेत तुरीची आवक कमी असतानादेखील हमीभाव मिळत नाही.

लातूर ः तेलंगणा, कर्नाटक राज्याने हमीभावाप्रमाणे तुरीची खरेदी सुरू केली आहे. महाराष्ट्र मात्र आॅनलाइन नोंदणीच्या प्रक्रियेतच अडकल्याचे चित्र आहे. हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने बाजारभाव पडलेले आहेत. हमीभावापेक्षा बाजारात सध्या सर्वसाधारण दर १३०० रुपयांनी कमी आहेत. तुरीची आवक कमी असतानाही ही परिस्थिती आहे. तुरीची आवक वाढल्यानंतर तर हे भाव आणखीनच कोसळण्याची शक्यता आहे.  या वर्षी केंद्र शासनाने तुरीसाठी पाच हजार ४५० रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. केंद्र शासनाच्या आयात- निर्यात धोरणाचा किंचितसा परिणाम बाजारपेठेवर झालेला दिसत आहे. त्यामुळे चार हजार रुपयांच्या वर तूर गेली; पण शासनाच्या एनसीडीईएक्सवर हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी केली गेली आहे.  दीड ते दोन हजार रुपये हमीभावापेक्षा कमी दराने ही खरेदी केल्याने त्याचाही परिणाम बाजारपेठेवर झाल्याचे दिसून येत आहे. सट्टेबाजांनी यात हात धुऊन घेतल्याचे सांगितले जाते. एक महिन्यापासून तुरीची आवक सुरू झाली आहे. या एक महिन्यात फक्त एकच दिवस चार हजार सातशे रुपये भाव गेला. उर्वरित मात्र सरासरी चार हजार ते साडेचार हजार रुपयेच भाव राहिला आहे. लातूरसह अकोला, सोलापूर, जळगाव अशा महत्त्वाच्या बाजारपेठांत हाच भाव राहिला आहे. हमीभावापेक्षा एक हजार रुपये कमी दराने तूर विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.  बाजार तुटत असल्याने खरेदीदार या मानसिकतेतून बाहेर यायलाच तयार नाहीत. त्यामुळे तूरडाळीला उठावच नाही. मागणी नसल्याने त्याचा परिणामही आता बाजारपेठेवर दिसून येत आहे. तसेच, शासनाने गेल्या वर्षी खरेदी केलेली ६५ लाख तूर विक्रीस काढली आहे. बाजारभावाप्रमाणेच त्याचा लिलाव होत आहे. शासनच हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची विक्री करीत असल्याचा परिणामदेखील बाजारपेठेवर होत आहे. तेलंगणने आतापर्यंत ३३ हजार ५०२ क्विंटल, तर कर्नाटकने १० हजार ५६९ टन तुरीची खरेदी केली आहे. कर्नाटक राज्य तर हमीभावाच्या वर राज्य शासनाचा बोनसही देऊन शेतकऱ्यांना दिलासा देत आहे.  आवक कमी तरीही... गत वर्षी डिसेंबरमध्ये तुरीची हमीभावाने खरेदी करणारे महाराष्ट्र मात्र सध्या जाहिरातबाजीतच मश्गुल आहे. आॅनलाइन नोंदणीच्या प्रक्रियेतच शासन अडकले आहे. हमीभावाने खरेदी केंद्रे सुरू झाली तरच बाजारपेठेतील भावातही वाढ होण्याची शक्यता आहे. लातूरसारख्या बाजारपेठेत सात-आठ हजार क्विंटलची आवक आहे. आवक कमी असताना भाव वाढत नाहीत. आवक वाढल्यानंतर तर आणखी भाव कोसळण्याची शक्यता आहे.  प्रतिक्रिया सध्या आयात कमी असतानासुद्धा तुरीचा भाव पडलेला आहे. शासनाने खरेदी केंद्र सुरू केले तर हा भाव वाढण्यास मदत होणार आहे. यासोबतच कुपोषणमुक्तीसाठी प्रथिने गरजेची आहेत, ती डाळीतून मिळतात. याचा प्रचारही करण्याची गरज आहे.  - हुकूमचंद कलंत्री, तुरीचे व्यापारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com