बीड : जिल्ह्यात हमीभावाने खरेदी केलेला १ लाख ३७ हजार क्विंटल तूर व हरभरा साठविण्यासाठी गोदामांमध्ये जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे खरेदी केलेला शेतीमाल केंद्रावरच पडून असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
बाजारात दर पडल्याने शासनाने हस्तक्षेप करून बीड जिल्ह्यात तुरीची हमीभावाने खरेदी करण्यासाठी पंधरा केंद्रे सुरू केली. या केंद्रांवरून २ मेपर्यंत १८ हजार ८०० शेतकऱ्यांकडून सुमारे १ लाख ८९ हजार ६४२ क्विंटल तुरीची हमीभावाने खरेदी करण्यात आली. या तुरीपैकी केवळ ८६ हजार २६ क्विंटल तुरीलाच गोदामात साठविण्यासाठी जागा मिळाली. उर्वरित १ लाख ३ हजार ६१६ क्विंटल तूर साठविण्यासाठी जागाच न मिळाल्याने खरेदी केंद्रावर पडून होती.
गोदामात साठविल्या गेलेल्या तुरीची पावती वरिष्ठ पातळीवर पोचत असल्याने तेवढ्याच तूर खरेदीचे चुकारे शेतकऱ्यांना मिळण्याची प्रक्रिया सुरू होते. आता जसजशी जागा रिकामी होईल तसतशी गोदामांमध्ये तूर साठवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तुरीबरोबरच मार्चच्या सुरवातीच्या आठवड्यात बीड जिल्ह्यातील पंधरा केंद्रांवर हमीभावाने हरभऱ्याची खरेदी सुरू करण्यात आली. यापैकी जवळपास सात केंद्रांवर हरभऱ्याची आवक झाल्याचे आकडे सांगतात. या सातही केंद्रांवरून ३१०८ शेतकऱ्यांकडून २ मेपर्यंत ४१ हजार २१६ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या हरभऱ्यापैकी ७ हजार २६९ क्विंटल हरभरा साठविण्यासाठी जागा मिळाली. अजूनही ३३ हजार ९४७ क्विंटल हरभरा साठविण्यासाठी जागा मिळाली नाही.
त्यामुळे तुरीसोबतच हरभऱ्याचीही ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या खरेदीतील शेतकऱ्यांना तातडीने अपेक्षित असलेल्या चुकाऱ्याचा प्रश्न कायम आहे. लग्नसराईत शेतीमालाचे चुकारे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे.