औरंगाबाद : खरेदी केंद्रे सुरू होऊन तूर खरेदीही झाली. परंतु लातूर आणि बीड आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतच जवळपास १ लाख १० हजार क्विंटल तूर जागेअभावी खरेदी केंद्रावरच पडून आहे.
यामध्ये लातूर जिल्ह्यातील ३० हजार, बीड जिल्ह्यातील ६० हजार, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास २२ हजार क्विंटल तुरीचा समावेश आहे. सारं काही ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या प्रक्रियेत तूर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना विक्री केलेल्या मालाचे पैसे अजूनही मिळाले नसल्याचे चित्र आहे.
तुरीचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यात यंदा हमीभावाने तूर खरेदीसाठी दहा केंद्रे सुरू करण्यात आली. या दहा केंद्रांवरून ८८७४ शेतकऱ्यांची ८४ हजार ८११ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. साठवणुकीसाठी आवश्यक जागेअभावी ३० हजार ५६ क्विंटल तूर अजूनही संबंधित केंद्रावर पडून आहे. वेअर हाउसमध्ये ५४ हजार ७५५ क्विंटल तूर साठविण्यात आली आहे. खरेदी करण्यात आलेल्या तुरीच्या चुकाऱ्यापोटी ४६ कोटी २२ लाख २४ हजार ९१५ रुपये शेतकऱ्यांना देणे बाकी आहे, असे सूत्रांनी सांगितले.
बीड जिल्ह्यात ८८४६ शेतकऱ्यांची ८३ हजार ४२८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. साठवणुकीच्या जागेची सर्वाधिक अडचण असलेल्या बीड जिल्ह्यात खरेदी केलेल्या तुरीपैकी तब्बल ६० हजार क्विंटल तूर केंद्रावरच पडून आहे. केवळ २२ हजार ९८० क्विंटल तूर गोदामामध्ये साठविण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात जवळपास ५८ हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. त्यापैकी जवळपास २२ हजार क्विंटल तूर जागेअभावी खरेदी केंद्रावरच आहे. अपेक्षित चुकाऱ्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खाती वर्ग होणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बहुतांश जिल्ह्यात हरभऱ्याची नोंदणीच सुरू आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी मंजूर १४ केंद्रांपैकी अंबाजोगाई आणि आष्टी या दोन खरेदी केंद्रांवर ७१ शेतकऱ्यांच्या ९१८ क्विंटल २६ किलो हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे. अंबाजोगाईच्या केंद्रावर ४६४ क्विंटल, तर आष्टीच्या केंद्रावर ४५३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाल्याची नोंद आहे. जागेअभावी खरेदी केलेला हरभराही केंद्रावरच पडून आहे.