अकोला : पर्यायी पीक म्हणून वऱ्हाडातील शेतकरी हळद लागवडीकडे वळू लागले असतानाच, या हंगामात हळदीचे क्षेत्र तब्बल २५ ते ३० टक्क्यांनी घटल्याचा अंदाज जाणकारांकडून व्यक्त होत आहे. कमी झालेले पाणी, गेल्या हंगामातील बाजारभाव आणि घटलेली उत्पादकता या कारणांमुळे शेतकऱ्यांनी क्षेत्र कमी केले.
गेल्या काही हंगामापासून या भागात हळदीच्या लागवडीत वाढ होत होती. मागील हंगामापर्यंत हे चक्र सुरू होते. परंतु दोन-तीन वर्षांत पावसाचा लहरीपणा कमालीचा वाढला. त्यातच मागील वर्षी हळदीला कमी दर मिळाले. सध्या इतर पिकांच्या तुलनेत हळदीसारखे पीक हे शेतकऱ्यांना पर्याय मिळाले. त्यामुळे वाशीम जिल्ह्यात प्रामुख्याने हळद लागवडीवर शेतकऱ्यांचा भर वाढत होता.
या जिल्ह्यात रिसोड, मालेगाव, वाशीम या तालुक्यांमध्ये हळद लागवडीचे क्षेत्र अधिक राहत असते. परंतु या हंगामात या तालुक्यांमध्ये प्रत्येक शेतकऱ्याने लागवड कमी केली. त्यामुळे २५ ते ३० टक्के क्षेत्र कमी झाल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत. जूनमध्ये पाऊस पडला की हळद लागवड सुरु होते. या हंगामात पावसाने दमदार सुरवात केली. परंतु नंतर पाऊस कमी पडल्याने शेतकऱ्यांनी अंदाज घेत हळद लागवड कमी केली. दुसरीकडे या मोसमात लागवड कमी झाली असून, तसेच दक्षिणेकडील राज्यांमध्येही हीच स्थिती आहे. यामुळे आगामी काळात हळदीचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
या मोसमात लागवड झालेल्या हळदीला कमी पावसाचा फटका बसला. हळदीची सर्वच भागांत वाढ कमी झालेली आहे. रोपांवर करप्यासह अन्य रोग आढळून आले. या मोसमात सरासरी ३० ते ४० टक्के पाऊस कमी पडलेला आहे.