कोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी पूर्ण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर  : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत आहे. डिसेंबरच्या पहिल्या सप्ताहाअखेर २० टक्के ऊस तोडणी पूर्ण झाली आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा उसाचे क्षेत्र १५ टक्क्यांनी वाढले तरी उत्पादनात २५ टक्क्यांपर्यंत घट येत असल्याने शेतकरी अडचणीत येत आहेत. त्यातच कोणत्याही कारखान्याने पहिला हप्ता अद्याप जमा न केल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहे.

दिवाळीनंतर गाळप हंगाम सुरू झाला. यंदा मजुरांची समस्या फारशी जाणवत नसल्याने तो एक दिलासा पहिल्या टप्प्यात तरी कारखान्यांना मिळाला आहे. यंदा ऊस क्षेत्र वाढल्याने मजूर कमी आले तर काय करायचे या चिंतेत कारखाने होते. परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे मजुरांची उपलब्धता पुरेशी झाली. यंदा प्रतिकूल परिस्थितीमुळे उसाची वाढ खुंटली आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात तर ऊस नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. सलग तीन महिने पाऊस असल्याने ऊस कुजण्याचे प्रमाण वाढले. यामुळे कारखान्यांचे अंदाज चुकले आहेत. ज्या प्लॉटमधील तोडणी दोन दिवसांत व्हायची ती आता एका दिवसात होत आहे. यामुळे ऊस तोडणी जलद होत आहे. त्यामुळे क्षेत्र वाढले असले तरी यंदाची ऊस तोडणी वेळेत होण्याची शक्यता आहे.

पहिला हप्ता कोण जमा करणार? हंगाम सुरू होऊन महिना झाला तरी अद्याप कारखान्यांनी शेतकऱ्यांची रक्कम जमा केली नाही. काही कारखाने पहिला हप्ता देण्याच्या तयारीत आहेत. पण इतर कारखान्यांकडून याबाबत सकारात्मकता नसल्याने हा निर्णय थांबला आहे. पुढील सप्ताहात काही कारखाने यंदाचा पहिला हप्ता जमा करण्याची शक्यता आहे. एका कारखान्याने बिले जमा केल्यास इतर कारखाने ही बिले जमा करतात असा अनुभव जिल्ह्यातील कारखान्यांचा आहे. यामुळे बिले जमा करणारा पहिला कारखाना कोणता असणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com