अमरावती ः कर्जमाफीच्या दोन याद्या जाहीर झाल्या असून, वरुड तालुक्यातील फक्त दोन शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाल्याने कर्जमाफीची सरकारची घोषणा फसवी ठरल्याचा आरोप होत आहे.
विशेष म्हणजे पहिल्या यादीत कर्ज माफ झालेले दोन शेतकरी आहेत, तर दुसऱ्या यादीत एकही शेतकरी पात्र ठरला नाही. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेअंतर्गत वरुड तालुक्यातून ३५ हजार ३७० शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले होते. यापैकी जाहीर झालेल्या जिल्ह्याच्या १०० शेतकऱ्यांच्या यादीत वरुड तालुक्यातील केवळ दोन शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला.
त्यानंतर कर्जमाफीदार १००० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये तालुक्यातील एकाही शेतकऱ्याचा समावेश नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
कर्जमाफीसाठी अर्ज भरणाऱ्यांमध्ये जिल्हा बॅंक आणि राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या कर्जदारांचा समावेश आहे. कर्ज माफ झालेले जलालखेड येथील शेतकरी अफरोजजहाँ अहमद काझी अहमद यांचे स्टेट बॅंकेचे, तर सुनंदा सुधाकर नागमोते यांचे नरखेड येथील स्टेट बॅंकेचे कर्ज होते. चावडीवाचनाच्या अभिप्रायानुसार आणि शासन निकषानुसार ते पात्र असल्याचे आढळून येत असल्याने त्यांना कर्जमाफी देण्यात आली.