पुण्यातील पावसावर ‘उजनी’ने गाठली शंभरी

उजनी धरण भरले
उजनी धरण भरले

सोलापूर   : पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटत आहे. पण, सोलापूर जिल्ह्यात अद्यापही पावसाने दमदार हजेरी लावलेली नसताना, पुणे जिल्ह्यातील पावसावर जिल्ह्याची वरदायिनी समजल्या जाणाऱ्या उजनी धरणाने मात्र सोमवारी (ता. २७) दुपारी बारा वाजता १०० टक्‍क्‍यांचा टप्पा पार केला. धरणातील या पाण्यामुळे परिसरातील शेतीसह पिण्याच्या पाणी योजनांना लाभ होणार असला, तरी निम्मा जिल्हा अद्यापही तहानलेला आहे.

उजनी धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे पुण्याकडील या धरणांतून उजनी धरणात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाण्याचा विसर्ग  सुरू आहे. गेल्या आठ दिवसांत तर हा विसर्ग झपाट्याने वाढला, तसा धरणातील साठाही वेगाने वाढला. सोमवारी दुपारी बारा वाजता दौंडचा विसर्ग ३९ हजार ९८१ क्‍युसेक इतका केल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत राहिले. त्यामुळे धरणातील पाणीसाठा १०० टक्‍क्‍यावर पोचला.

उजनी धरणाच्या निर्मितीपासून यंदा १६ व्या वेळा धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १०० टक्के भरले आहे. गेल्या ३७ वर्षांत अनेकदा ऐन पावसाळ्यात पाणीपातळीने मृतसाठा गाठला, तर अतिवृष्टीमुळे आतापर्यंत आठवेळा उजनी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. पण यंदा जिल्ह्यात काहीशी दुष्काळाची परिस्थिती असताना, आता धरण शंभर टक्के भरल्याने पंढरपूर, माढा, करमाळा, माळशिरस, मोहोळ आणि मंगळवेढ्याचा काही भाग, या परिसराला दिलासा मिळणार आहे. पण, धरणाच्या कार्यक्षेत्रातील शेवटच्या टोकाला असलेल्या अक्कलकोट, दक्षिण आणि उत्तर सोलापूर, बार्शी या पट्ट्यात मात्र अजूनही पाण्यासाठी प्रतीक्षाचा वाट्याला आली आहे.

त्यातच यंदा पावसाळ्याच्या सुरवातीला जूनमध्येच काही तो चांगला पाऊस झाला. पण, त्यानंतर त्याने प्रदीर्घ विश्रांती घेतली, ती थेट ऑगस्टपर्यंत, गेल्या आठ-दहा दिवसांपासून पुन्हा त्याने सुरवात केली आहे. पण त्यात जोर नाही, जलसाठे होऊ शकतील, विहीर, बोअरला पाणी वाढेल, अशी स्थिती सध्या तरी नाही. जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ५४५ मिलिमीटर आहे. यंदा आतापर्यंत सरासरी १५१.३३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पावसाच्या या बेभरवशामुळे खरिपातील मूग, मटकी, उडिद ही पिके जवळपास जळून गेली आहेत. आता केवळ सोयाबीन, तूर ही पिके हातात राहिली आहेत. पण, त्यांच्याही उत्पादनाबाबत साशंकता आहे. उजनीतील या पाण्याचा ऊसपट्ट्याला लाभ होणार आहे.

उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याचा प्रवाह अखंडपणे सुरूच आहे. दौंडकडील विसर्ग सोमवारी दुपारपर्यंत ३९ हजार ९८१ क्‍युसेक इतका कायम होता. त्यामुळे धरण ओव्हरफ्लो होऊ नये, यासाठी धरणातून पुढे भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. धरणातून नदीत पाच हजार क्‍युसेक इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्याशिवाय बोगद्यातून १०५०, कालव्यातून २३०० आणि सीना- माढा योजनेसाठी ३५० क्‍युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणातील पाण्याची स्थिती
 एकूण साठा   ११७.२१ टीएमसी
उपयुक्त साठा  ५३.५६ टीएमसी
अचल साठा ६३.६५ टीएमसी
टक्केवारी १००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com