ढगाळ वातारणाने रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढला

ढगाळ वातारणाने रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढला
ढगाळ वातारणाने रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढला

पुणे : राज्यात गेल्या २-३ दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणाने खरिपातील काढणीला अालेली पिके, रब्बीतील काही पिके, फळबागा अाणि भाजीपाला उत्पादकांचे धाबे दणाणाले आहे. ढगाळ वातावरण, तापमानातील अचनाक चढ-उतार, धुके, पाऊस आणि वाढत्या आर्द्रतेने पिकांवर रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाचा एकवेळ फायदा होत असला, तरी ढगाळ वातारणाने चिंता वाढली आहे. 

औरंगाबाद/जालना : जिल्ह्यात सर्वच पिकांसह फळपिकांवर प्रादुर्भाव वाढला आहे. द्राक्ष, डाळिंब, भाजीपालाकरिता पीक संरक्षण खर्चात वाढ झाली आहे. फ्लावरिंगच्या द्राक्ष बागांमध्ये घडकूज वाढली आहे. डाउनी पुन्हा तोंड काढण्याची शक्यता आहे. डाळिंबात कळीगळ वाढली आहे. मिरचीमध्ये भुरी व फुलगळीसह थ्रीप्सचा प्रादुर्भाव आहे. डाळिंब बागांमध्ये ‘प्लेग’ व मृग बहराच्या फळांमध्ये क्रॅकिंगचे प्रमाणही वाढले. रब्बी ज्वारीवर लष्करी अळीसोबतच खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. 

कोल्हापूर : ढगाळ हवामानाचा फटका भाजीपाला पिकाला बसला आहे. वांगी, भेंडी, फ्लॉवर आदी भाज्यांवर हा प्रादुर्भाव वाढला आहे. हिरव्या मिरचीवर कीड-रोगांचा, वांग्यावर फुलगळ आणि फळ पोखरणारी अळी, पांढरी माशी, कोबीवर किडीचा प्रादुर्भाव आहे. गाळप हंगामावर परिणाम होत आहे. ओलसरपणामुळे वाहने अडकून बसण्याचे प्रमाण वाढत आहे. 

सोलापूर : जिल्ह्यात द्राक्षावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कांदा आणि भाजीपाल्यावरही रोगांचे प्रमाण वाढले आहे. द्राक्ष बागा सध्या फुलोऱ्यात आहेत. शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी वाढवली आहे. ज्वारी पिकाला मात्र चांगलाच फायदा होत आहे. हरभरा, तूर पिकांवर शेंगा पोखरणारी अळी झपाट्याने वाढण्याचा धोका आहे. कांद्याच्या नव्याने लागवडीवर तुडतुडे, माव्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. 

सातारा : जिल्ह्यात सोमवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. रब्बी पिकांच्या दृष्टीने पाऊस फायदेशीर आहे. खरीप हंगामातील अंतिम टप्प्यात काढणीतील पिके भिजल्याने नुकसान होत आहे. भाजीपाला पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

सांगली : जिल्ह्यात द्राक्षावर भुरी, डाउनी रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. बुरशीनाशकाचा एक स्प्रे घेण्यासाठी ३ ते ५ हजार रुपयांपर्यंत खर्च वाढतो. तीन आठवड्यांत डाउनीची भीती, भुरीचा प्रादुर्भाव झाल्याने फवारण्या वाढणार आहेत. 

परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत तुरीचे पीक फुलोरा, शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून, शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढणार आहे. ढगाळ वातावरणामुळे वाढलेला उकाडा ज्वारीच्या वाढीसाठी पोषक ठरत असले, तरी गहू, हरभरा पिकासाठी तो पोषक नाही. 

जळगाव : जिल्ह्यात केळी, कापूस व तूर उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. केळीवर करप्याचा प्रादुर्भाव वाढून पाने पिवळी पडत आहेत. तुरीमध्ये फुलगळ सुरू असून, तयार शेंगांवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कपाशीची बोंडे ओली झाल्याने दर्जा घसरू लागला आहे. मका, ज्वारीची काढणी सुरू असून, नासाडी होऊ नये म्हणून काढणीअभावी पडून असलेले कणसे झाकून ठेवण्यासाठी रोज सायंकाळी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागते. 

अकोला : कमी थंडी, ढगाळ हवामान, धुके अशा प्रकारच्या वातावरणामुळे तुरीची फुलगळ वाढली आहे. वांगी, टोमॅटो, मिरची तसेच पालेभाज्यावर्गीय पिकांवर पांढरी माशी, रसशोषणारी कीड व रोग वाढण्याची शक्यता. काही ठिकाणी हरभरा पिकात मूळकूजसारखे प्रकार होत आहेत. 

नाशिक : प्रतिकूल हवामामुळे जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांचे धाबे चांगलेच दणाणले. द्राक्ष सध्या छाटणीनुसार काही फुलोरा, मणी धारणा आणि पक्वतेच्या टप्प्यात आहे. भुरी, डाऊनी या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती आहे. सटाणा तालुक्यात अर्लीचे द्राक्ष काढणीच्या अवस्थेत आहेत. मणी तडकण्याची येथे भिती व्यक्त केली जात आहे.  इगतपुरी तालुक्‍यात भात सोंगणी अंतिम टप्प्यात आली आहे. दरवर्षी वाढता उत्पादन खर्च आणि हाती येणारे उत्पन्न याचा ताळमेळ घालताना शेतकरी मेटाकुटीस येत आहे. पाऊस आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे या भागातील भातशेतीचे गणित बिघडले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com