मुंबई : महाराष्ट्रात सिंचनासाठी २६ प्रकल्प मंजूर केले अाहेत. त्यामुळे २० टक्के सिंचन ४० टक्क्यांवर नेऊन महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या इतिहासजमा होतील, असे प्रतिपादन केंद्रीय जलसपंदामंत्री नितीन गडकरी यांनी केले. दोन वर्षांत महाराष्ट्रात परिवर्तन होईल, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय उद्योग महासंघ (फिकी) आयोजित ''प्रगतिशील महाराष्ट्र''च्या पाचव्या परिषदेत त्यांनी संबोधित केले. या वेळी त्यांनी महाराष्ट्रातील मंजूर सिंचन प्रकल्पांविषयी माहिती दिली. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
मंत्री गडकरी म्हणाले, की केंद्र सरकारने जलवाहतुकीसाठी प्राधान्य दिले अाहे. त्यामुळे वाहतूक खर्च कमी करणार अाहे. सिंचन सर्वात मोठी समस्या अाहे. देशातील ११ राज्यांत पाणीटंचाई अाहे. महाराष्ट्राचे २० टक्के सिंचन वाढवून ते ४० टक्के करून कृषी विकासाचे २० टक्के ध्येय गाठता येईल, अशी अाशा त्यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना ते म्हणाले, की दमनगंगेचा नवा करार अंतिम टप्प्यात असून २०७० पर्यंत उत्तर महाराष्ट्रातील पाणीप्रश्न सुटेल. ७० टक्के पाणी समुद्रात जाते; ते अतिरीक्त नद्यांचे पाणी वळवणार आहे. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र उत्तम संधी असल्याचे सांगितले.