परभणी ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक भागांत शुक्रवारी (ता. १६) पहाटे पाच वाजल्यापासून दुपारपर्यंत अधूनमधून रिमझिम पाऊस सुरू होता.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागाच्या वेधशाळेत शुक्रवारी (ता. १६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १.८ मिमी पावसाची नोंद झाली.
नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई तसेच हळदीची सुगी ऐन भरात आहे, परंतु गेल्या आठवड्यापासून जोराच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे कापणी केलेल्या पिकांचे भिजून नुकसान होत आहे.
कापणी केलेल्या ज्वारी, गव्हाच्या पेंढ्यांची पसर तसेच हरभरा, करडईचे कापणी केलेले पीक शेतामध्ये पडून आहे. पावसामुळे ते भिजत आहे. पिकांचे पावसापासून संरक्षण करताना शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.
सुगी ऐन भरात असताना अवकाळी पाऊस पाठ सोडायला तयार नाही. हाताशी आलेला घास हिरावण्याची चिन्हे दिसत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत या तीन जिल्ह्यांतील अनेक भागांत रिमझिम पाऊस सुरू होता. आभाळ भरून आल्यामुळे पावसाळी वातावरण झाले होते.