सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे. याचा परिणाम द्राक्षांच्या दरावर झाला आहे. एका दिवसांत दर ३० ते ४० रुपयांनी कमी झाले आहेत. तसेच डाळिंबावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने द्राक्ष, बेदाणा आणि डाळिंब उत्पादक धास्तावले आहेत.
जिल्ह्यात शनिवारी सकाळी ढगाळ हवामान होते. असेच वातावरण राहिल्यास द्राक्ष व बेदाणा उत्पादकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या वर्षीचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे, पन्नास टक्के द्राक्षे अजून बागेतच आहेत. मणेराजुरी, सावळज, तासगाव परिसरातील द्राक्ष हंगाम जोरात आहे. तेथील द्राक्षांना दर ही चांगले मिळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अचानक हवामान बदलल्याने शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.
हवामान असेच राहिल्यास त्याचा परिणाम द्राक्ष दरावर होणार आहे. हवामान बदलाचा फायदा घेऊन व्यापारी दर पाडून मागत आहेत. त्यामुळे कोट्यवधींचा फटका द्राक्षबागायतदारांना बसणार आहे. दोन दिवसांपूर्वी १६० रुपयांनी मागितलेली बाग शनिवारी १३० रुपयांनाही मध्यस्थ घेत नसल्याने द्राक्ष बागायतदार त्रस्त झाले आहेत.
जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यांत डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात लागवड आहे. ढगाळ हवामानामुळे डाळिंबावर तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.