नगर ः जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. सध्या गहू, कांदा पीक काढणीला आले आहे. पावसाने पिकांचे नुकसान होऊ नये याची शेतकऱ्यांना धास्ती लागली आहे. त्यामुळे काढणी केलेला गहू, कांदा झाकणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. द्राक्ष उत्पादकही पावसाच्या भीतीने धस्तावले आहेत. शुक्रवारी सकाळी काही ठिकाणी पावसाची रिमझिम झाली.
नगर जिल्ह्यामध्ये यंदा एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर गव्हाची पेरणी झालेली आहे. हरभऱ्याचे क्षेत्रही नव्वद हजारांच्या जवळपास आहे. सध्या गहू ऐन काढणीत आहे, मात्र दोन दिवसांपासून ढगाळ वातारण असून, अवकाळी पाऊस व गारपिटीची हवामान विभागाने शक्यता वर्तवली असल्यामुळे शेतकरी काळजीत आहेत.
हाती आलेले पीक वाया जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांची काढणी केलेला गहू, हरभरा, कांदा झाकणीसाठी लगबग सुरू आहे.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. गुरुवारी सायंकाळी व शुक्रवारी सकाळी नगरसह कोपरगाव, अकोले, राहाता, राहुरी, शेवगाव, श्रीगोंदा भागात पावसाची रिमझिम झाली. ढगाळ हवामानामुळे भाजीपाल्यावर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
श्रीगोंदा, संगमनेर आदी भागांत द्राक्ष उत्पादन घेतले जाते. सध्या बऱ्याच ठिकाणी द्राक्षाचीही काढणी सुरू आहे. त्याचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.