नगर : पशुसंवर्धन विभागातील निविदा प्रक्रियेच्या घोळात अडकलेल्या लाळ्या-खुरकुताच्या लसीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. राज्यपातळीवरून लसीचा पुरवठा झालेला असून बुधवारपासून (ता. ७) जिल्हाभर लसीकरणाला सुरवात केली जाणार आहे. २८ मार्चपर्यंत लसीकरण मोहीम सुरू राहील. शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना लसीकरण करून घेण्याचे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी अवाहन केले आहे. जिल्ह्यातील सोळा लाख ४८ हजार ५४८ जनावरांना लसीकरण केले जाणार आहे.
जिल्ह्यात गायवर्गीय १४ लाख २७ हजार १८५ तर म्हैसवर्गीय २ लाख २१ हजार ३६३ जनावरे आहेत. वर्षातून दोनवेळा लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लसीकरण करण्याची मोहीम राबवली जाते. गतवर्षी एप्रिल २०१७ मध्ये लसीकरण करण्यात आले होते. त्यानंतर सप्टेंबर २०१७ मध्ये लसीकरण करणे गरजेचे होते.
मात्र, वरिष्ठ पातळीवर लस पुरवठा करण्याच्या निविदा प्रक्रियेचा जवळपास वर्षापासून घोळ सुरू होता. त्यामुळे जनावरे लसीकरणापासून वंचित राहिली. अखेर वर्षाच्या सरतेशेवटी निविदा प्रक्रियेचा तिढा सुटला असून लसीचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे यंदा वर्षाअखेर का होईना जनावरांना लाळ्या खुरकुत प्रतिबंधक लसीकरण
केले जाणार आहे.
बुधवारपासून जिल्हाभर लसीकरणाला सुरवात केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना लाळ्या खुरकुताचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील, उपाध्यक्ष राजश्री घुले, सभापती अभय फटांगरे, कैलास वाकचौरे, अनुराधा नागवडे, उमेश परहर यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये गाय व म्हैसवर्गीय मिळून नगर तालुक्यात एक लाख ३१ हजार २१५, राहुरीत एक लाख ३४ हजार ७३९, श्रीरामपुरात ८० हजार ५९४, पारनेरमध्ये एक लाख ३७ हजार ४५९, राहात्यात ७८८१४, कोपरगावात ६९ हजार ६०८, अकोल्यात एक लाख ७८०, श्रीगोंद्यात १ लाख ६१ हजार ८९४, कर्जतमध्ये एक लाख सतरा हजार ५२९, जामखेडमध्ये ८० हजार १६६, पाथर्डीत एक लाख २५ हजार ५५८, शेवगावात एक लाख एक हजार ८४२, नेवाशात एक लाख ३६ हजार १४८ आणि संगमनेर तालुक्यात एक लाख ९२ हजार २०२ अशी सोळा लाख ४८ हजार ५४८ जनावरे असून त्यांना लसीकरण केले जाणार असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांनी सांगितले.