वाकुर्डे सिंचन योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचेही काम अर्पूणच

वाकुर्डे सिंचन योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचेही काम अर्पूणच
वाकुर्डे सिंचन योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचेही काम अर्पूणच

वाकुर्डे बुद्रुक सिंचन योजनेचा लेखा- जोखा भाग 3

सांगली ः वाकुर्डे सिंचन योजनेचे दोन टप्पे पूर्ण झाले. योजना कार्यन्वित झाली. शिराळा आणि कऱ्हाड तालुक्‍याला या सिंचन योजनचे पाणी मिळू लागले; पण हे पाणी मर्यादित वाहू लागले. वाकुर्डे बुद्रुक येथे या योजनेचा भाग एकचा तिसरा टप्पा उभा करण्याचे नियोजन केले. त्यासाठी जागा अधिग्रहण केली आहे; परंतु या तिसऱ्या टप्प्याला अद्यापही निधी मिळाला नाही.

त्यातच आता या योजनेचे पाणी बंदिस्त पाइपलाइनद्वारे शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. मात्र, निधीच नाही तर उर्वरित कामे पूर्ण कशी होणार आणि तिसरा टप्पा कधी उभारणार, असा प्रश्‍न वाळवा तालुक्‍यातील शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. वाकुर्डे सिंचन योजनेचे पाणी सध्या शिराळा आणि कऱ्हाड तालुक्‍यात जात आहे. या योजनेतून वाळवा तालुक्‍यालाही पाणी देण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी वाकुर्डे बुद्रुक या ठिकाणापर्यंत वाकुर्डे उपसा सिंचन योजनेचे पाणी गेले आहे.

या ठिकाणांहून वाळवा तालुक्‍याला पाणी देण्याचे नियोजन आहे. शिरशी (ता. शिराळा) येथे तिसरा टप्पा उभा केला जाणार आहे. या ठिकाणी 170 अश्‍वशक्तीचे दोन पंप बसविण्यात येणार आहेत. तिसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळाली असल्याचे संबंधित विभागाने सांगितले. त्यासाठी जागादेखील अधिग्रहण केली आहे; परंतु गेल्या सात वर्षांपासून या टप्प्याला निधीच उपलब्ध झाला नाही. त्यामुळे तिसऱ्या टप्प्याचे काम रखडले आहे. तिसरा टप्पा झाला तर शिराळा तालुक्‍यासह उर्वरित गावासह वाळवा तालुक्‍याला पाणी मिळणार आहे. योजना पूर्ण करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष वास्तविक ही योजना मूळ 109.86 कोटींची आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी शासनाने दुर्लक्ष केले. यामुळे या योजनेवरचा खर्च वाढत गेला. तरीदेखील ही योजना पूर्णत्वाकडे गेली नाही. भाजपचे सरकार सत्तेत येऊन तीन वर्षांचा काळ लोटला. सांगली जिल्ह्यातील ताकारी, टेंभू, म्हैसाळ सिंचन योजनांना भरीव निधी दिला. मग वाकुर्डे सिंचन योजनेला भरीव निधी का दिला नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

शिराळा तालुक्‍याचे आमदार शिवाजीराव नाईक हे भाजपचेच आहेत. त्यांचीच सत्ता आहे. आमदारांनी निधी मागण्यासाठी प्रयत्न केला का? गेल्या तीन वर्षांत आमदार निधी आणण्यासाठी अपयशी ठरले असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. सध्या ही योजना पूर्ण करण्यासाठी 516.24 कोटींची आवश्‍यकता आहे. हा निधी मिळवण्यासाठी आमदार शिवाजीराव नाईक शर्तीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, हा निधी शासन कधी देणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. बंदिस्त पाइपद्वारे पाणी देण्याचे नियोजन ज्या पद्धतीने टेंभू सिंचन योजनेचे पाणी बंदिस्त पाइपद्वारे देण्याचे नियोजन शासनाने केले आहे. त्याचप्रमाणे वाकुर्डे सिंचन योजनचे पाणीदेखील शेतकऱ्यांना बंदिस्त पाइपद्वारे देण्यात येणार आहे. त्याचे सर्व्हेक्षण सुरू झाले असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे. मात्र, वास्तविक पाहता याचे सर्वेक्षण कसे आहे, ते कोणत्या ठिकाणाहून पुढे होणार आहे, याबाबत शेतकऱ्यांना कोणतीच माहिती नाही. त्याचप्रमाणे संबंधित अधिकारी बंदिस्त पाइपद्वारे पाणी देण्याचे सर्व्हेक्षण सुरू असल्याचे ठाम सांगताहेत, पण शेतकरी म्हणतात की, असे सर्व्हेक्षण सुरूच झालेले नाही.

आजपर्यंत निवडणुकीच्या तोंडावर घोषणाच झाल्या. त्यामुळे वाकुर्डे सिंचन योजनेचे पाणी कठीण आहे. मुळात वाकुर्डे सिंचन योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले नाही. तर पाणी कुठून मिळणार. - संग्राम सावंत, माणिकवाडी, ता. वाळवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com