‘बंद’मुळे भाजीपाला पुरवठा विस्कळित

‘बंद’मुळे भाजीपाला पुरवठा विस्कळित
‘बंद’मुळे भाजीपाला पुरवठा विस्कळित

मुंबई: देशभरातील मालवाहतूकदार संघटनांचे देशव्यापी चक्का जाम आंदोलन आणि सकल मराठा समाजाने बुधवारी पुकारलेल्या एकदिवसीय ‘बंद’मुळे मुंबईतील भाजीपाला आणि फळांचा पुरवठा विस्कळित झाला. बंदमुळे भाजीपाला, फळांची निम्मीच आवक झाल्याने दरवाढ अटळ असल्याचे सांगण्यात आले.  दरम्यान, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देशाच्या विविध राज्यांमधून भुसार माल येत असल्याने मालवाहतूकदारांचा संप असाच सुरू राहिला, तर भुसार मार्केटमध्येही अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस या देशपातळीवरील मालवाहतूक करणाऱ्या संघटनेने गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत देशव्यापी संप पुकारला आहे. डिझेलचे वाढते दर, जीएसटी, टोल, थर्डपार्टी इन्शुरन्स यासह अनेक मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. माल वाहतूकदारांनी सुरू केलेल्या या संपामुळे वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मालवाहतूक करणारी वाहने थांबवून ठेवण्यात आली आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज ३ हजारांपेक्षा जास्त वाहने येतात. संपामुळे वाहनांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. तसेच जे ट्रक बाजार समितीच्या ट्रक टर्मिनसमध्ये दाखल झालेले आहेत, त्यापैकी बहुतांश ट्रक बाजार समितीमध्येच अडकून पडले आहेत. संघटनेने या संपाची सूचना ३ महिन्यांपूर्वीच दिली होती. मात्र, याची सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे हा देशव्यापी संप सुरू करण्यात आला आहे. जोपर्यंत माल वाहतूकदारांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत हा संप मागे घेणार नसल्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या संपामुळे मुंबईच्या भाजीपाला पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यातच सकल मराठा संघटनांनी बुधवारी एकदिवशीय बंद पुकारला होता. त्यामुळे यात आणखीच भर पडली आहे. मुंबई बाजार समितीत एरवी सरासरी ५५० ट्रक भाजीपाला लागतो. तसेच कांदा-बटाटा सुमारे २०० आणि फळांचे सुमारे ३०० ते ३५० ट्रक येत असतात. यापैकी राज्यभरातून साठ टक्के भाजीपाला, फळे येतात. यात नाशिक, पुणे जिल्ह्यांचा वाटा मोठा आहे. तर उर्वरीत चाळीस टक्के शेतमाल शेजारील राज्यांमधून येत असतो. सकल मराठा आंदोलनामुळे राज्यातून मुंबईकडे येणारी शेतमालाची बहुतांश आवक थांबली आहे. तर मालवाहतूकदारांच्या संपामुळे शेजारील गुजरात, कर्नाटकचा सीमाभाग, आंध्र प्रदेश आदी राज्यांमधून होणारी भाजीपाला, आणि फळांची आवक थांबली आहे. एपीएमसीतील माथाडी कामगारांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजीपाला, फळ मार्केट वगळता इतर चारही मार्केट बंदच होती. तर भाजीपाला आणि फळ मार्केटही सकाळी १० वाजेपर्यंतच सुरू होते.  बुधवारी बाजार समितीत नेहमीपेक्षा निम्मीच आवक झाल्याने त्याचे तीव्र परिणाम गुरुवारी भाजीपाला, फळांच्या दरांवर दिसून येणार आहेत. घाऊक बाजारात तसेच किरकोळ बाजारातील भाजीपाल्यांच्या दरामध्येही दरवाढ अपेक्षित असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. बंदमुळे खरेदीदार नसल्याने मुंबईतील भाजीपाला पुरवठा विस्कळित झाला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com