लातूर ः सतत दोन वर्षे झालेला चांगला पाऊस, काळ्या आईच्या कुशीत उभारी घेत असलेली रब्बीचे पिके, हरिवीगार झालेली रानं, अशा प्रसन्न वातावरणात रविवारी (ता. १७) जिल्ह्यात वेळ अमावास्या उत्साहात साजरी करण्यात आली. या सणाच्या निमित्ताने बळिराजाकडून काळ्या आईचे मनोभावे पूजन करण्यात आले. आप्तेष्टांना, मित्रांना शेतात बोलावून वनभोजनाचा आनंदही सर्वांनी घेतला. या सणाच्या निमित्ताने गावात मात्र शुकशुकाट राहिला; रानं मात्र फुलून गेली होती.
वेळ अमावास्या हा ग्रामीण संस्कृतीचा सण आहे. शेतकरी व शेतीशी निगडित सर्व कुटुंबीय हा सण मोठ्या उत्साहाने साजरे करतात. रविवारी वेळ अमावास्या होती. सकाळपासून प्रत्येक घरात शेतात जाण्याची घाईगडबड सुरू राहिली. सकाळी दहा-अकरा वाजता गावात शुकशुकाट; तर शेतं मात्र गजबजली गेली होती. स्वतःची वाहने, तसेच मिळेल त्या वाहनाने नागरिक शेतात जाताना दिसून येत होते. यातूनच एसटी महामंडळाच्या बसला गर्दी होती. खासगी वाहतूक करणारी वाहनेही प्रवाशांनी तुडुंब भरून जाताना दिसत होती.
जिल्ह्यात या वर्षी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे रब्बी पिके चांगली आहेत. काळ्या आईच्या कुशीत ही पिके उभारी घेत आहेत. पाऊसपाणी चांगले असल्याने शेतकरी समाधानी आहे. त्यामुळे या सणाला सर्वत्र उत्साहाचे वातावरण राहिले. रानारानांत प्रसन्न वातावरणात बळिराजाने काळ्या आईची मनोभावे पूजा केली. प्रत्येक शेतात पाच पांडव तयार करून त्यांचीही पूजा करण्यात आली.
वेळ अमावास्या म्हटले की वनभोजनाचा आनंद येतो. वनभोजनासाठी बाजरीच्या भाकरी, सर्व भाज्या एकत्रित करून तयार केलेली भज्जी, वांग्याचे भरीत, ताकापासून तयार केलेले आंबील, बाजरीचे उंडे, तीळ गुळाची पोळी असा मेनू राहिला. आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र परिवाराला बोलावून शेतकऱ्यांनी वनभोजनाचा आनंद दिला. ज्यांना शेती नाही अशांनी शहरातील बागेत जाऊन वनभोजनाचा मनमुराद आनंद घेत हा सण साजरा केला.