सोलापूर ः वेळा अमावास्येनिमित्त सोलापूर जिल्ह्यातील शेतशिवारात रविवारी (ता. १७) एक वेगळेच चैतन्य भराला आले. पाच पांडवांची प्रतीकात्मक पूजा आणि मित्र आप्तेष्ठांच्या भोजनावळीने शेतशिवारांतील उत्साह अगदीच शिगेला पोचला होता.
वेळ अमावास्येला शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक वेगळे महत्त्व असते. मार्गशीर्ष महिन्यातील ही अमावास्या एखाद्या सण, उत्सवाप्रमाणे शेतकरी साजरी करतात. प्रामुख्याने यामध्ये काळ्या आईचे आपण काही देणे लागतो, या समर्पण भावनेने या दिवशी शेतात पाच पांडवांची प्रतीकात्मक पूजा केली जाते. रब्बी हंगामातील पिके या वेळी ऐन भरात आलेली असतात. या पिकांच्या संरक्षणाची जबाबदारी म्हणूनही पांडवांची पूजा केली जाते, अशी अख्यायिका आहे.
या दिवशी सर्व प्रकारच्या चुका, पालक, मेथी यांसारख्या भाज्यांचे मिश्रण असलेली भज्जी, पुरणपोळी, बाजरीचे उंडे, ताकाचे अांबील, शेंगापोळी आणि भजीपापडासह गव्हाची खीर असा मेनू नैवैद्यासाठी असतो. या दिवशी खासकरून मित्रमंडळी, पै-पाहुणे, आप्तेष्ट यांना भोजनासाठी आमंत्रण दिलेले असते.
आज रविवार आणि त्यातही अमावास्या असा मेळ साधला गेल्याने, जिल्ह्यातील विविध भागांतील शेतशिवारात दुपारी बारानंतर मित्र, आप्तेष्ठांची गर्दी झाली होती. शेतातील मस्त भोजन आणि ऊस, हरभऱ्याच्या रानमेव्याने या उत्साहात आणखीनच भर टाकली.