लोकसहभागातूनच जलसंधारण यशस्वी होईल : विद्यासागर राव

राज्यपाल
राज्यपाल

मुंबई : यंदा राज्याच्या काही भागांत पाण्याची स्थिती गंभीर झाली आहे. जलसंवर्धन ही काळाची गरज आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब कसा वाचविता येईल याचा विचार करणे आवश्यक झाले आहे. लोकसहभागातूनच जलसंधारणाची चळवळ यशस्वी होऊ शकेल तसेच लोकसहभागातूनच गावे सुजलाम, सुफलाम होतील, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.  यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायतराज संस्था आणि गुणवंत अधिकारी व कर्मचारी गौरव समारंभ रवींद्र नाट्य मंदिर येथे शुक्रवारी (ता. २६) झाला. त्या वेळी ते बोलत होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले की, महाराष्ट्राने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यामुळे राज्याच्या पंचायत राज संस्थांमध्ये महिला प्रतिनिधींचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. महाराष्ट्रात अनुसूचित क्षेत्रात पेसा कायद्याची अंमलबजावणी चांगली होत आहे. त्या ठिकाणी तेंदू, मध, बांबू यांच्या संकलन आणि विक्रीचे अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. गाव समृद्ध झाले तरच देश समृद्ध होईल. यासाठी शेतीला उद्योगधंद्याची जोड दिली पाहिजे. ‘महालक्ष्मी सरस’ हे केवळ वार्षिक प्रदर्शन न राहता तो लघुउद्योग झाला पाहिजे.   मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ‘खेड्याकडे चला’ या संदेशाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासन ग्रामविकासावर मोठा भर देत आहे. राज्यात विविध आवास योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. नुकतेच पंतप्रधानांच्या हस्ते अडीच लाख घरांचे लोकार्पण करण्यात आले. याशिवाय जागा नसलेल्या ग्रामस्थांना पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतून जागा खरेदीसाठी अनुदान देण्यात येत आहे. शासकीय जागांवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व योजनांमधून संपूर्ण महाराष्ट्र राज्य बेघरमुक्त करण्याचे स्वप्न साकार होत आहे. सांगली जिल्हा परिषद प्रथम  सांगली जिल्हा परिषदेला २५ लाख रुपयांचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार अनुक्रमे सिंधुदुर्ग आणि अमरावती जिल्हा परिषदेला प्रदान करण्यात आला. या जिल्हा परिषदांना अनुक्रमे १७ लाख आणि १५ लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंचायत समित्यांचे राज्यस्तरीय प्रथम ३ पुरस्कार हे भंडारा (जि. भंडारा), कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) आणि शिराळा (जि. सांगली) यांना अनुक्रमे १७ लाख, १५ लाख आणि १३ लाख रुपयांचे प्रदान करण्यात आले. अनिल देवकाते, आनंद भंडारी, परीक्षित यादव, विजय चव्हाण यांना गुणवंत अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय विविध विभागस्तरीय पुरस्कारांचेही या वेळी वितरण करण्यात आले. आदर्श ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी पुरस्कारही या वेळी प्रदान करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com