शंभर टक्के सूक्ष्म सिंचनासाठी साताऱ्यातील १७३ गावांची निवड

१०० टक्के सूक्ष्म सिंचनासाठी जिल्ह्यातील १७३ गावे प्रथम टप्प्यात निवडण्यात आली आहेत. यामध्ये या गावांमधील सर्व विहिरींवरील भीजक्षेत्र पुढील दोन वर्षांत ठिबक सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या निवडलेल्या गावांतील लोकांना पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याकरिता सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. - श्‍वेता सिंघल, जिल्हाधिकारी, सातारा.
सुक्ष्म सिंचन
सुक्ष्म सिंचन

सातारा : पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने पाणीटंचाई वाढू लागली आहे. अतिरिक्त उपशामुळे भूजल साठा वेगाने घटत आहे. यास पर्याय म्हणून जिल्ह्यात सूक्ष्म सिंचनाला भर दिला जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी १०० टक्के सूक्ष्म सिंचनासाठी १७३ गावांची निवड केली आहे. फलोत्पादन आणि बिगर फलोत्पादन पिकाकरिता सूक्ष्म सिंचन संचासाठी अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी ५५ टक्के आणि इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान दिले जाणार आहे.

जिल्ह्यातील शेती प्रामुख्याने मोसमी पावसावर अवलंबून आहे. भूजल पातळीत दिवसेंदिवस होत असलेली घट आणि पावसाचा अनियमितपणा तसेच मागील तीन वर्षांत सरासरीपेक्षा कमी पडलेला पाऊस यांमुळे उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने आणि नियोजनबद्ध वापर करणे अपरिहार्य झाले आहे. जलयुक्त शिवार अभियानातून जल व मृदसंवर्धनाबाबत कामे हाती घेण्यात आली आहे. परंतु, उपलब्ध असलेल्या व निर्माण झालेल्या पाणीसाठ्याचा पिकांसाठी अनियंत्रित व बेसुमार वापर होत असल्याने पाणीटंचाई निर्माण होत आहे. तसेच, जलसंवर्धनाच्या कामाचा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने दुष्काळजन्य स्थिती निर्माण होत आहे. दुष्काळी स्थितीमुळे पाण्याचा एकंदर असलेला साठा हा वेगाने घटत आहे.

या समस्येवर पर्याय म्हणून ठिबक सिंचन व तुषार सिंचन पद्धती वापरावर भर दिला जाणार आहे. २०१५-२०१६ ते २०१८-२०१९ अखेर जलयुक्त शिवार अभियानामध्ये निवडण्यात आलेली गावे व पाणी फाउंडेशनअंतर्गत वॉटर कॅप स्पर्धेत भाग घेतलेल्या गावांपैकी काही गावे शंभर टक्के सूक्ष्म सिचंनाखाली आणण्याचे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल कृषी दिन कार्यक्रमात घोषित केले होते. यानुसार जिल्ह्यातील १७३ गावांची निवड करण्यात आली आहे. २०१८-१९ मध्ये केंद्र शासनाने महाराष्ट्राकरिता पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना या नावाने योजनेस मान्यता दिली आहे.

यातून केंद्र व राज्याचा हिस्सा ६०:४० टक्के या प्रमाणात जिल्ह्याकरिता मोठ्या प्रमाणात निधी देणार आहे. या योजनेत फलोत्पादन आणि बिगर फलोत्पादन पिकाकरिता सूक्ष्म सिंचन संचासाठी अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी ५५ टक्के आणि इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के दराने अनुदान दिले जाणार आहे.

तालुका निहाय निवड झालेली गावे ः सातारा १५, कोरेगाव ३०, खटाव ४०, कराड २०, पाटण ४, वाई १०, जावली ५, खंडाळा ४, फलटण २५, माण २०.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com