परभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी परभणी जिल्ह्यातील १०५ गावांची निवड करण्यात आली. चौथ्या वर्षासाठी गावांची निवड करण्यात आली असली, तरी दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षीतील अनेक कामे अद्याप रखडलेलीच आहेत. ही कामे पूर्ण करून यंदा निवड करण्यात आलेल्या गावांतील कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे.
२०१९ पर्यंत महाराष्ट्र टंचाईमुक्त करून सर्वांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. जलयुक्त शिवार अभियानचे यंदाचे हे चौथे वर्षे आहे. २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत १७० गावांची निवड करण्यात आली होती.
पहिल्या वर्षी जिल्ह्यात दुष्काळी स्थिती होती. त्यामुळे लोकसहभाग तसेच शासकीय यंत्रणा यांच्याकडून अनेक गावांत जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली. त्यांचे चांगले परिणाम दिसून आले. अनेक गावे टॅंकरमुक्त झाली.
२०१६-१७ आणि २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील अनुक्रमे १६० आणि १२८ गावांची अभियानात निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये करावयाच्या जलसंधारणाच्या कामांचे आराखडे तयार करण्यात आले. परंतु अनेक गावांतील कामे अद्याप अपूर्ण आहेत.
जलयुक्त शिवार अभियानच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील कामे अर्धवट असताना २०१८-१९ मधील म्हणजेच चौथ्या वर्षामध्ये जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील १०५ गावांची निवड करण्यात आली आहे.