नाशिक : वाढीच्या अवस्थेतील गहू पिकाला थंडीची प्रतीक्षा आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे पुरेशा थंडी पडत नसल्याने शेतकऱ्यांसमोरील चिंता वाढली आहे.
ओखी वादळानंतर नाशिक जिल्ह्यात सर्वत्रच रब्बीच्या पिकांना तडाखा बसला आहे. वादळानंतर विषम हवामानामुळे करपा, बुरशीजन्य रोगास रब्बी पिके बळी पडू लागली आहेत. त्यामुळे पिके जगवण्यासाठी धडपड करीत महागड्या कीटकनाशकांसाठी वाटेल ती किंमत मोजून पिकांवर फवारणी केली जात आहे. रब्बीच्या चांगल्या हंगामासाठी अजूनही काळवंडलेले आभाळ शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याने शेतकरी कडाक्याच्या थंडीच्या प्रतीक्षेत आहेत.
यंदा थंडीने बराच उशीर केला. ऐन दिवाळीत पावसाळी वातावरण तयार झाले. त्यानंतर थंडीला सुरवात होते न होते तोच ओखी वादळाचा प्रभाव जिल्ह्यातील वातावरणात दिसून आला. अजूनही काळवंडलेले आभाळ असल्याने कडाक्याची थंडी पडत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत दिसत आहेत. एरवी दुष्काळी परिस्थितीत पावसाची चातकप्रमाणे वाट बघणारा शेतकरी रब्बीतील चांगल्या उत्पादनासाठी कडाक्याच्या थंडीची वाट पाहत आहे.
रब्बी पीकवाढीसाठी किमान १० ते १५ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त ठरते. विषम हवामानाचा पिकावर परिणाम होत आहे. थंडी नसल्याने गहू पिकाची फुटव्याची व ओंबीतील दाण्याची संख्या कमी होऊन उत्पादनात घट होईल. हरभरा पिकावर थंडी नसल्याने घाटे अळीचा प्रादुर्भाव होईल. मुख्य पीक असलेल्या कांद्यावर करपा, मावा पडून नुकसान होईल. त्यासाठी फवारणी करूनही उत्पादन निघेल, याची खात्री नाही. त्यामुळे कडाक्याची थंडी पडणे आवश्यक असल्याचे मत मातोरी येथील शेतकरी कैलास पिंगळे यांनी व्यक्त केले.